शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

मनोहर जोशींचा महत्वाचा पण दुर्लक्षित पैलू!

MANOHAR JOSHI मनोहर जोशी


मनोहर जोशींच्या आयुष्यात डोकावताना त्यांच्या राजकीय भूमिकांचा खल अनेकजण पाडतील; मात्र त्यात सर्वांना स्वारस्य असेल असे नाही.चाळीसच्या दशकात जन्मलेल्या जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत भिक्षुकी करत असत.त्यांच्या बालपणीचा एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता जिथे अनेक तऱ्हेच्या जीवनदायी साधनांची कमतरता होती. अशी प्रतिकूल स्थिती असूनही त्यांच्या अंगी शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळेच विपरीत काळावरही त्यांना मात करता आली.

रायगड जिल्ह्यातील नांदवी हे त्यांचे गाव. त्या काळात कोकण किनारपट्टी पूर्णतः सर्वंकष साधनांच्या अभावाने ग्रासलेली होती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती.
दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. बहीण खूप सधन अवस्थेत होती अशातली गोष्ट नव्हती. तिच्यापाशी आल्याने त्यांना शिक्षणाचे सक्षम पर्याय गवसले जे त्यांच्या गावात त्यांना कधीच मिळाले नसते.
मोठ्या शहरांचा हा फायदा असतो, जो तरुण मनोहर जोशींनी अचूक घेतला.
मात्र हे शिक्षण त्यांना सहजी घेता आले नाही.
त्यासाठीचा आर्थिक स्रोत त्यांच्यापाशी नव्हता. त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्या आधारे शिक्षण घेतलं.
किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण झालं.

स्वतंत्र भारतातले ते पहिले दशक होते. उच्चशिक्षण घेणाऱ्या हातांना तेव्हा नोकरी बऱ्यापैकी सत्वर मिळत असे. जोशींना फारशी खटपट न करता मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरीही मिळाली. मात्र या दरम्यानही त्यांचे शिक्षण सुरु होते ही एक महत्वाची गोष्ट होय.
मात्र एमएचे शिक्षण पूर्ण होताच डिसेंबर १९६१ मध्ये त्यांनी पालिकेची नोकरी सोडली होती.

शक्यतो नोकरी पेशात रमणारा वर्ग म्हणून ज्या जातवर्गाची गणना होते त्या वर्गवारीतुन येणारा एक तरुण चक्क सरकारी नोकरी सोडतो हे जरा वेगळेच चित्र होते. कारण अत्यंत विषम परिस्थितीत शालेय शिक्षण घेऊन, शहरातही स्वकमाईने उच्च शिक्षण पूर्ण करून कुणाला जर सरकारी नोकरी मिळाली तर त्याच्यासाठी जणू स्वर्गप्राप्ती असते! मात्र जोशींनी तो मोह तिथेच दूर लोटला आणि एक भव्योदात्त स्वप्न पाहिले, जे पुढे जाऊन पुरेही केले!

पालिकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आवडीचा शिक्षकी पेशा स्वीकारला होता. शिवाय त्यांना एलएलबीचे पूर्णवेळ शिक्षण घ्यायचे होते. १९६४ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशींचे एमए. एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.
इथे त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला तो म्हणजे स्वतःचे क्लासेस सुरु करण्याचा!
आता ते केवळ मनोहर जोशी उरले नव्हते तर प्रिन्सिपॉल मनोहर जोशी झाले होते. त्यांच्या नावाचे साइनबोर्ड असणारे कोहिनूर क्लासेस आधी मुंबईत सुरु झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

सुरुवातीला चौकटबंद साच्यात असणारे हे क्लासेस त्याच दशकात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या रूपात पुढे आले. 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टीट्यूट'चे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले.
जवळपास महत्वाच्या सर्व छोट्या मोठ्या शहरात एसटी स्टॅन्ड अथवा स्टेशन परिसरात जोशी सरांचे कोहिनूर क्लासेस दिसू लागले.
ज्यांना आयटीआयला प्रवेश मिळत नव्हता ते सर्रास कोहिनूरमध्ये प्रवेश घेत असत. फिटरपासून इलेक्ट्रिशियनपर्यंत आणि मेकॅनिकपासून ते एसी रिपेअरिंगपर्यंत अनेक कोर्सेस तिथे उपलब्ध झाले.

दरम्यान सरांची राजकीय पत वाढल्याचा नेमका फायदा त्यांनी या संस्थेला करून दिला. नोकरीची हमी देणारी शिक्षणसंस्था म्हणून ही संस्था नावरूपाला आली. राज्याच्या ग्रामीण भागातून मुले मोठ्या संख्येने प्रवेश घेऊ लागली, त्यांना त्या अनुषंगाने रोजगारही मिळत गेला हे वास्तव होते.
मात्र सर राजकारणातून फेकले जाण्याचा कालखंड आणि कोहिनूरचे साचेबद्ध झालेले शिक्षण एकाच काळात झाल्याने कोहिनूरचे नाव मागे पडत गेले. वेळेवर अपडेट न केले गेल्याने ही संस्था मागे पडली ती कायमचीच!

इतकी चांगली शैक्षणिक सूत्रे जुळवून आणूनही गणपती दूध पितो याचे ऑनलाईन रेकॉर्डिंग करून तशी अफवा पसरवण्याचा बाष्कळ मूर्खपणा त्यांनी केला होता हेही नमूद केले पाहिजे!

मनोहर जोशी शिवसेनेला काही अंशी ओझे वाटू लागले आणि त्यांचे रूपांतर अडगळीत झाले हे वास्तव होते मात्र याची कारणे शोधली तर या कृतीचे उत्तरही सापडते. असो.
मनोहर जोशींचे जाणे राजकीय दृष्ट्या विविध संदर्भाचे असेल मात्र त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक संदर्भही आहेत हे महत्वाचे आहे.
कारण खूप कमी राजकारण्यांच्या वाट्याला हे संदर्भ येतात.
मरण पावलेल्या व्यक्तीला चांगलेच म्हटले पाहिजे याचे बंधन नाही मात्र त्याची चिकित्सा अगदी तटस्थपणे निर्विकारपणे करायची झाल्यास त्याच्या अन्य बिंदुंचा आढावाही घेतला जाणे अनिवार्य आहे.

आरंभीच्या काळातील शिवसेनेतील कोणत्याही नेत्याकडे सहकार वा शैक्षणिक चळवळींचा वारसा नव्हता कारण या संघटनेची / पक्षाची स्थापनाच मुळी भावनेच्या आधारावरील मुद्द्यांना धरून होती.
यामुळेच मनोहर जोशींचे वेगळेपण लक्षात येते.
त्यांचा वैयक्तिक इतिहास पाहिला की मग भिन्नतेचा हा परीघ आणखी थोडा मोठा वाटू लागतो.
मात्र त्यांच्या या बिंदुची चर्चा फारशी झाली नाही याची कारणे राज्याच्या जातीय, सामाजिक आणि राजकीय समीकरणात दडून होती.

मनोहर जोशींच्या जाण्याने ऐंशी नव्वदच्या दशकातील ग्रामीण व निमशहरी तरुणांना नेहमीच्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता पोटापाण्याचे शिक्षण सहज उपलब्ध करून देणारा एक वेगळा संदर्भ लयास गेला आहे.

- समीर गायकवाड

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

आयुष्याची लढाई!

जगण्याची लढाई आयुष्य कामगार श्रमिक


संध्याकाळी बागेजवळ एका टोपल्यामध्ये खापराच्या मटक्यात कोळशाचे निखारे ठेवून गरम शेंगा विकणाऱ्या माणसाच्या सर्वच शेंगा विकल्या गेल्या तरी त्यातून त्याला किती रुपये मिळत असतील या प्रश्नाने नेहमीच पिच्छा केलाय!याच्या जोडीने आणखी नोंदी मागोमाग येतात.
गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात...
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.

कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामासाठी जी माणसं राबत असतात त्यातील तळाच्या माणसाचे हात रितेच असतात आणि त्याचं घरही उतरतीला लागलेलं असतं. 
श्रमणाऱ्या हातांचे बक्कळ कमावते असण्याचे एखाद दुसरे अपवाद असू शकतील मात्र अपवाद म्हणजेच सकल सत्य नसतं.

सद्यकाळात कष्टकऱ्यांना, 
अंगमेहनत करणाऱ्याना समाजात कसलेही मानाचे स्थान नाही आणि दिवसेंदिवस श्रमाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित होत असतानाही जे लोक नाईलाजाने स्वतःला जुंपून घेतात त्यांच्या श्रमास मूल्य नाही!
किती क्लेशदायी विरोधाभास आहे हा!

या माणसांचीही काही स्वप्ने असतील का आणि त्या स्वप्नांचे पुढे जाऊन काय होत असेल?

वास्तवात ही माणसं आपली रोजमर्राची जंग दिवसाढवळ्या हरत असतात तरीही आयुष्याच्या लढाईला ते रोज उठून कशाच्या आधारे सामोरे जात असतील हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करत आलाय आणि प्रेरणाही देत आलाय!

आयुष्याच्या लढाईच्या न सुटणाऱ्या गुंत्यातल्या नोंदी..

- समीर गायकवाड

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

कलात्मक अभिव्यक्तीवर धर्मवादाचे दडपण!

अभिव्यक्ती स्वातंत्र्य कला धार्मिक कट्टरतावाद सनातन


२०१७ साली मुंबईमधील बरेलवी रझा अकादमीने इराणी चित्रपट निर्माते दिग्दर्शक माजिद माजिदी आणि विख्यात भारतीय संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या विरोधात बहिष्काराचा फतवा काढला होता. निमित्त होते एका सिनेमाचे, 'मोहम्मद - मेसेंजर ऑफ गॉड' या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर बनवलेल्या सिनेमामुळे देशातले कर्मठ मुस्लिम संतापले होते. सिनेमा तयार झाला नि रिलीजही झाला. २१ जुलै २०२० साली तो डॉन वाहिनीवरून ऑनलाइन स्ट्रीम होणार होता. रझावाले न्यायालयात गेले नाहीत त्यांनी सत्तेत असणाऱ्या महाआघाडी सरकारकडे याचिका दाखल केली की, या चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रक्षेपण होऊ देऊ नये. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यास मान्यता देत सिनेमा प्रदर्शित होऊ दिला नाही. उलट त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली की देश पातळीवरही बंदी लादली जावी. सर्व सोशल मीडिया साधनांवरून हा सिनेमा हटवण्याची त्यांनी मागणी केली होती. 'द वायर'मध्ये शुद्धव्रत सेनगुप्ता यांनी त्यावर कडक निर्भत्सना करणारा लेख लिहिला होता आणि राज्य सरकारच्या या निर्णयास आव्हान देणे गरजेचे आहे असे म्हटले होते. मात्र तसे काही झाले नाही.

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

नैतिकतेचा दंडुका आपल्या हाती शोभतो का?

पूनम पांडे नैतिकता


अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे की मरण पावली आहे हे अजून नेमके कळलेले नाही. परंतु लोकांनी सवयीप्रमाणे तिची ‘अब्रू’ चव्हाट्यावर आणलीय! आता तिची अब्रू म्हणजे काय? तिचं शरीर, तिचे लैंगिक अवयव की तिच्या सेक्स विषयक भावना? तसं तर तिने तिचे सारं शरीर पूर्वीच दाखवलेलं आहे. देहावरचे सर्व कपडे पूर्वीच काढलेत! मागून पुढून, वरून खालून लोकांनी तिला पाहिलंय! कुणी एकांतात बंद खोलीत वा लपून छपून पाहिले असेल, कुणी मित्रांबरोबर मिटक्या मारत पाहिले असेल तर कोणी थेट ग्रुप करून एन्जॉय करत पाहिले असेल पण तिला पाहिलेलं आहे हे नक्की! ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांनी नसेल पाहिले. पण त्यांची संख्या किती हे सांगता येणार नाही. आता हेच पहा की, ती मरण पावलीय असं नुसतं सुतोवाच केलं गेलंय तरी तिच्या पोस्टवरती लोक तुटून पडलेत! जणू तिच्या देहावर पडण्याचे सुख त्यात अनुभवता आलेय. कदाचित ती जिवंतपणी यांच्यासमोर एकांतात अशीच विवस्त्र येती तर यांच्या सुखभावना प्रत्यक्षात अंमलात आणल्या असत्या! तिचा दोष काय होता? काय अपराध होता? तर ती एक पॉर्नस्टार होती. सेक्सविषयी तिच्या भावना आणि तिचं राहणं, जगण्या विषयीचे तिचे दृष्टिकोन कथित सभ्य लोकांच्या पांढरपेशी परिघाबाहेरचे होते! सर्वांनी तसेच असले पाहिजे असेही काही नाही मात्र जो परिघाबाहेर राहून बंधने तोडतो त्याला त्याची किंमत मोजावी लागते हा आपला 'न्याय' आहे!

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!



दोनेक वर्षांपूर्वीच्या कडक उन्हाळ्यातली गोष्ट. बरड रानातल्या बांधालगत असणाऱ्या भल्याथोरल्या उंच पिंपळावर वरच्या बाजूला धनेश (हॉर्नबिल) पक्षाने घरटे केले होते. जाडजूड फांदीच्या ढोलीत खचका पाहून घरटं बांधलेलं. एरव्ही भयंकर एकजीव असणारी नर मादीची जोडी घरटं बांधताना नर खाली साठलेले चिखल मातीचे गोळे वर घेऊन जायचा. झाडाच्या बुंध्यापाशी जुनी डोबी होती, त्यातलं पाणी झिरपून तिथं ओल तयार झाली होती. त्याच चिखलाचे गोळे नराने वर नेलेले. मादीने बहुतके तीन अंडी घातली होती, ती आतच बसून होती. अंडी उबवून पिले जन्माला यायच्या काळात घरट्याचे तोंड जवळपास पूर्णतः बंद झालेलं. फक्त मादीची चोच बाहेर राहील इतकीच सांद त्याने ठेवली होती. पिले जन्मली. मादी पिलांसोबत आत घरट्यात आणि नर सकाळ संध्याकाळ घरट्यापाशी! दिवसातून दोनतीन वेळा तरी तो त्यांचं खाद्य घेऊन तिथं यायचा. मादीच्या तोंडात घास घालायचा, ती आपल्या चोचीतून पिलांच्या चोचीत घालायची. पिले दोन तीन आठवड्याची झाली असतील. एव्हाना मे महिन्याचे कडक उन्हाचे तडाखे बसू लागले होते. एके दिवशी हवेतला उष्मा अतिशय टोकाला पोहोचला. वाऱ्याचे नामोनिशाण नव्हते. जीवाची नुसती काहिली होत होती. रणरणत्या उन्हात सारं चराचर म्लान होऊन निपचित पडलं होतं. त्या जीवघेण्या उन्हातही नर बाहेर पडला होता. मात्र त्यादिवशी अघटित घडलं. अवकाळी पाऊस बरसला. विजेच्या कडकडाटासह नि मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दोन तीनदा तरी वीज कोसळल्याचा आवाज आला. काळजात धस्स झालं. संध्याकाळ सरून गेली. गडद रात्र आली. नर परतला नव्हता. पिले व्याकुळ होऊन गेली होती. त्यांचा आवाज कुंठला होता, दोनच दिवसांनी मादीने जीव सोडला. धनेश पक्षाच्या जोडीतला नर मरण पावला तर मादी पिलांसकट जीव सोडते! किती हे प्रेम, किती उत्कट या संवेदना! कुठले विधी न करता नि कुठले प्रस्थ न माजवता हे पक्षी मुक्याने आपली प्रेमकथा निसर्गाच्या पटावर लिहून जातात. ही संवेदनशीलता अफाट आहे.

आपल्याच धडावर आपलेच शिर असले पाहिजे!



आमच्या इथल्या एका कुख्यात तसेच विख्यात(!) कनवाळू महान राजकीय नेता कम कार्यकर्त्याचा मध्यंतरी अकाली (कारण तेच ते प्रसिद्ध लिव्हर / किडनी फेल्युअरचे!) मृत्यू झाला.
त्याची मयत वगैरे जाम थाटात काढली होती. तुफान पब्लिक मयतीला आलं होतं (तसेही आमच्या इथे रिकामटेकडी माणसे खूप असतात). पुढारी तर हरामी सगळे झाडून आले होते, त्या समाजातील पुढच्या मतांवर त्यांचा डोळा जो असतो! असो.
मयत झाली. त्या राजकीय कार्यकर्त्याची पत्नी अकाली विधवा झाली.
काही नालायकांनी तिच्या कानात राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न केला पण ती बधली नाही.
त्याच्या कोवळ्या पोरांना काही हराम्यांनी मधाचे बोट लावले.
पोरं बिथरली. बापाचे कटआऊट लावून बापाच्या राजकीय दुष्मनांना चॅलेंज देऊ लागली. परिसरात असणाऱ्या दोन नंबर धंद्यावरून भांडणे होऊ लागली.

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

प्रिय महानोर



प्रिय महानोर, 

तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.

गोठ्यातल्या गायी मौन झाल्या,
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली

उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले

गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला

उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले

तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली,
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या

रविवार, ३० जुलै, २०२३

लोभ आणि धर्म - ओशोच्या गोष्टी.



एकदा मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले होते आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता.
शेकडो पुरोहित आणि संन्यासी जमले होते. हजारो बघ्यांची गर्दी जमली होती.
पैशाचा बिनधास्तपणे मुक्तहस्ते व्यय सुरु होता. गाव मात्र वेगळ्याच कारणाने थक्क झाले होते!
कारण ज्या व्यक्तीने मंदिर बांधले आणि या सोहळ्यात एवढा पैसा खर्च केला त्याहून अधिक कंजूष माणूस कोणी असू शकत नाही, असे त्या गावातील लोकांना वाटत असे. ती व्यक्ती कंजूषपणाची आदर्श होती.

शनिवार, २४ जून, २०२३

त्यांच्यासाठी एक खिडकी खुली राहूद्यात!

श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत झालेले हत्याकांड असो वा अल्पवयीन साक्षीचे अघोरी हत्याकांड असो किंवा नुकतीच झालेली सरस्वती वैद्य या प्रौढ महिलेची निर्घृण हत्या असो. अशा हत्याकांडामधून काही गोष्टी कॉमन जाणवतात.
एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री घर सोडून निघून जाते अथवा घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध तिच्या इच्छेने कुणासोबत तरी राहू लागते तेव्हा घरातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत, हिंसक नकारात्मक आणि विरोधाच्या असतात.
खूप कमी लोक असे असतात की जे आपल्या मुलीच्या/ बहिणीच्या किंवा घरातल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात.
बहुतेकांना मात्र आपल्याच इच्छा आपल्याच अपेक्षा तिच्यावर लादायच्या असतात.
यातून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये एक ज्वलंत संघर्ष जन्म घेतो.

आपल्या मुलीने आपल्याच मर्जीप्रमाणे राहावे, आपण सांगू तेच ऐकावे त्याचबरोबर आपण ज्याच्याशी तिचे लग्न ठरवू त्याच्यासोबतच तिने लग्न करावे यासाठी अनेक पालक हट्ट धरतात. तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.
परिणामी मुलीला असे वाटते कि आपले कुणीच ऐकून घेत नाही.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे..



हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

शिवबा आपल्याला खरेच कळलेत का?


शिवाजीराजे म्हणजे मराठ्यांचं काळीज असं जेंव्हा लिहितो तेंव्हा नकळत आपण आपला खुजेपणा दाखवत असतो. शिवबा सगळ्यांचेच काळीज होते !

शिवाजी महाराज कसे होते हे सांगताना जो तो व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेले वा ज्या रूपांत तो राजांना पाहू इच्छितो तेच वर्णन संबंधितांकडून केले जाते.
मग सकल शिवाजी महाराज कळणार तरी कसे?
मनातले सर्व अभिनिवेश नि सर्व भावभावनांना दूर सारून राजांना पाहिलं तर हिमालयाहून उत्तुंग आणि जळाहून नितळ असे पराक्रमी, दक्ष, चाणाक्ष दूरदृष्टी असणारे द्रष्टे धोरणकर्ते, कुटुंबवत्सल, रयतप्रेमी, ज्ञानी, संयमी, शांत, विचारी अशा अनेक बहुआयामी राजांचे चित्र समोर येते.

ते क्षत्रियकुलावंतस असल्याचा अभिमान आपण मिरवतो तेंव्हा तो त्यांचा अभिमान नसून आपला वर्गीय अभिनिवेश असतो.
शिवबा राजांचं अस्तित्व सकल कुळ गोत्र जात धर्म यापलीकडचं होतं, त्याचा अभिमान असायला हवा!

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात. आता असे वातावरण झालेय की हिंदी चित्रपटसृष्टीच्या नियमित प्रेक्षकांनाही पुढचा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणता पहायचा आहे हे आठवावं लागतं. कारण मोजके अपवाद सोडल्यास या वर्षात 
आतापर्यंत जे छोटे-मोठे हिंदी चित्रपट आले आहेत, त्यांचे नशीब गुणवत्तेच्या आणि कलेक्शनच्या बाबतीत सर्वश्रुत आहे. बॉलीवूडचा शेवटचा फील-गुड चित्रपट कोणता होता किंवा ज्याच्या कलेक्शनची खूप चर्चा झाली होती असा चित्रपट लक्षात ठेवणे कठीण झालेय हे वास्तव आहे. त्या तुलनेत जर दक्षिणेच्या चित्रपटांबद्दल बोललो तर लगेचच 'RRR', 'KGF 2' आणि 'पुष्पा: द राइज' ही नावे समोर येतात. या चित्रपटांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे याची अलिकडे सातत्याने चर्चा होतेय. सिनेसृष्टीत दक्षिणोत्तर जे  काही घडते आहे त्यावर व बॉलीवूडमधल्या त्रुटींवर फोकस केला जातोय हे उत्तमच आहे मात्र काही प्रश्न चर्चेतून गायब आहेत जसे की दक्षिणेकडील ज्या चित्रपटांनी सणकून मार खाल्ला असे चित्रपट उत्तरेकडे चांगला व्यवसाय करतील का किंवा दक्षिणेकडे अपयशी ठरलेल्या चित्रपटांचे हिंदी रिमेक्स यशस्वी होतील का? दक्षिणेकडचे सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होताहेत का? तिकडच्या फ्लॉप सिनेमांची टक्केवारी किती आहे? असे मुद्दे चर्चेत नसतात! खरे तर यांची चर्चा झाली तर नेमके चित्र समोर येऊ शकते मात्र आपली माध्यमे अशी चर्चा करण्यात निरुत्साही दिसतात. किंबहुना ही मांडणीदेखील केली जात नाही. बॉलीवूडविरोधात सातत्याने बॉयकॉट मोहिमा चालवत असताना दक्षिणेकडील केवळ छप्परफाड यशाचेच गोडवे गायचे नि तिकडच्या 
समीरबापू
अपयशाविषयी मौन राहायचे असा एक फंडा सर्वत्र दिसतोय. याला राजकीय, आर्थिक, समाजिक नि धार्मिक कंगोरे असल्याने खरे स्वरूप समोर येणे तूर्तास कठीण दिसतेय हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडेही मोठ्या संख्येने सिनेमे कोसळत आहेत. तिकडच्या सिनेनिर्मात्यांनी धास्ती घेऊन मध्यंतरी थेट ओटीटीवरच प्रदर्शित करण्याचा सपाटा लावला. परिणामी थिएटर्स ओस पडली, चित्रपटसृष्टीच्या तंत्रज्ञ मंडळींनाही फटका बसला; चित्रपट निर्मितीसह वितरणव्यवस्थेतही बेफाम बदल झाले त्यामुळे अपवाद वगळता सगळ्यांचे पेकाट मोडायच्या बेतात आले. याविरोधात आंदोलन उभं राहिलं, चक्क स्टुडिओ बंद ठेवले गेले, महिनाभर चित्रपटनिर्मिती बंद पडली वा पुढे ढकलली गेली. अर्थात ज्या सिनेमांनी तिकीटबारीवर टाकसाळ खोलली होती त्याच्या निर्मात्यांनी सावध भूमिका घेतली. मग काही दिवसांनी सारं सुरळीत झाल्याचा देखावा केला गेला. चित्रपट निर्मिती पुन्हा सुरु झाली मात्र मूळ दुखणे कमीअधिक फरकाने बदललेल्या स्वरुपात तसेच राहिले. हा विषय माध्यमांत फारसा चर्चेस आलाच नाही मात्र ज्या मोजक्या सिनेमांनी अफाट यश मिळवले होते त्यांचीच चर्चा अधिक झाली. दक्षिणेकडील फ्लॉप्सची नोंद घेतली तरीही हिंदी सिनेमाच्या यशाच्या उतरत्या आलेखाची कड घेता येत नाही हे वास्तव आहे.

रविवार, १५ जानेवारी, २०२३

विहीर..

#sameerbapu
विहीर .. 

तुळसाबाई म्हणजे बज्याबाची बाईल! नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई. तिला काही सांगितलं तर ती वाकड्यात जायची. तांबूस गोऱ्या रंगाची बुटक्या चणीची तुळसा सदानकदा ओसरीवर नाहीतर संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. डोईच्या केसांना इतके तेल थापलेले असे की पदर तेलकट वाटायचा! बंद्या रुपयाचं कुंकू तिच्या व्हंड्या कपाळी असायचं. चाफेकळी नाक नसले तरी नाकपुड्या फार काही फेंदारलेल्या नव्हत्या. उतरत्या गालांच्या चेहऱ्याला आखूड हनुवटीची जोड होती त्यामुळे पत्त्यातल्या चौकट राणीसारखा तिचा चेहरा दिसायचा. तिचा रुबाबही राणीसारखा होता, बज्या शेळकेच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्या तिच्या शब्दाबाहेर नव्हता याची अनेक कारणे होती त्यातली फार थॊडीच गावाला ठाऊक होती. तुळसा अगदी तिरसट आणि तापड होती, बज्याच्या मामाची पोरगी होती ती. मामाने थाटात लग्न लावून दिलेलं, रग्गड पैसाअडका खर्च केलेला. गरीब जावयाचं बोट पिवळंधमक केलेलं, पोरीच्या अंगावर बक्कळ सोनं घातलेलं. आपली पोरगी डोक्यातून गेलेली आहे हे त्या बापाला माहिती होतं म्हणूनच त्यानं भाच्याला पोरगी देताना त्याला पुरतं मिंधं केलं होतं. बज्याचे हात त्या ओझ्याखाली अडकले होते. सासऱ्याच्या मदतीने त्यानं जमीनजुमला घेतला नि तिथून त्याचे दिवस फिरले! सारं होत्याचं नव्हतं झालं.

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

हम भी अगर बच्चे होते!

सन ऑफ इंडिया 

हिंदी चित्रपटसृष्टीने सर्वच वयोगटातील पात्रांना ग्लॅमर दिलेय, त्यांच्या भूमिकांना स्वतंत्र स्पेस दिलीय. हरेक वयाच्या कलाकारांना किर्ती मिळवून देताना हिंदी सिनेमा नित्य नव्या उंचीवर जात राहिलाय. कलाकारांनी देखील आपल्याला 
चाची 420 
मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाट्याला आलेल्या कॅरेक्टर्सना न्याय दिला. नायिका, नायकापासून ते खलनायकांपर्यंतच्या आलेखाचा आढावा घेताना बालकिशोरांच जगही सिनेमाने ध्यानात घेतल्याचे दिसते. देशात बालचित्रपटांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळालेले नाही हे जरी मान्य केले तरी बालमित्रांच्या जगास बहिष्कृतही केलेलं नाही हे ही खरेय. मुलांवर बनवलेले चित्रपट कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले गेलेत. इतर भारतीय भाषांपेक्षा हिंदीत बालचित्रपटांची निर्मिती जास्त झालीय. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत निर्मात्यांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून बालचित्रपट तयार केले आहेत. हे सिनेमे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर मुलांशी संबंधित समस्यांकडेही लक्ष वेधतात. 1980 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट एका अदृश्य माणसावर बनवला गेला होता पण त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू ही मुले होती. हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. 'तारे जमीन पर', 'मकडी', 'नन्हे जेसलमेर', 'इक्बाल', 'ब्लू अंब्रेला', 'जजंत्रम ममंत्रम', 'अपना आसमान', 'मेरे प्यारे प्राइम  मिनिस्टर', 'भूतनाथ', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बम बम बोले' आदी बालचित्रपटांनी बालचित्रपटाची संकल्पना थोडी बदललीय. नव्या संवेदनेवर निर्मिले गेलेले हे चित्रपट शक्यअशक्यतेचा नवा पट उभा करतात. या चित्रपटांमध्ये मानवी नातेसंबंध आणि सहवास भावना, मुलांच्या समस्या मोठ्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्याने चित्रित केल्यात. बालपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतानाच कधी त्यातली गंमत, कधी त्यांची भीती, कधी त्यांची निरागसता तर कधी त्यांची आंतरिक धडपड चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चित्रपट असेही आहेत जे विशेषतः मिलेनियल किड्सच्या आधीच्या पिढीशी बोलतात.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

गजब माणूस - इफ़्तिख़ार


हिंदी सिनेमाच्या कथा, पटकथांमध्ये अनेक तऱ्हेची पात्रे आढळतात. नायक, नायिका, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री, विनोदवीर, चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते आणि खलनायक ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. यांच्या जोडीने विविध छोटयामोठ्या भूमिका कथेच्या मागणीनुसार सिनेमात दिसतात. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, दुकानदार, पोलीस इन्स्पेक्टर - कमिशनर ही पात्रे बऱ्याच सिनेमात आढळतात, पैकी पोलीस इन्स्पेक्टरचे पात्र अधिक प्रमाणात आढळतं. मुदलात एकूण सिनेमाच्या दोन अडीच तासांच्या लांबीत हे रोल अवघ्या काही मिनिटांचे असतात. मात्र तरीदेखील या भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे काही अभिनेते होऊन गेले. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेले पोलिसी पात्र इतके खरेखुरे वाटायचे की हा इसम खरोखरच्या जीवनात पोलीस आहे की काय वाटावे! सत्तर एमएमच्या सिनेमास्कोप पडद्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्र्या नायक नायिका म्हणून आपला ठसा उमटवू शकले नाहीत मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पोलिसाच्या भूमिका करून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर होण्याची जादू काहींनी साधली! हे कशामुळे शक्य झाले याचे उत्तर एकच येते ते म्हणजे या अभिनेत्यांची आपल्या कामावरची निष्ठा आणि रसिक प्रेक्षकांचे त्यांच्यावरचे अपार प्रेम! नायक नायिकांना मिळणारे ग्लोरिफिकेशन या अभिनेत्यांच्या वाट्याला आलं! कोणताही रोल छोटा नसतो आणि कोणताही अभिनेता मामुली नसतो, तो ज्या भुमिकेत प्राण फुंकतो ती भूमिका सजीव होते हे नक्की! या वर्गातली हिंदी सिनेमाच्या इतिहासातली दोन ख्यातनाम नावं म्हणजे जगदीश राज आणि इफ्तेकार! जगदीश राज यांच्यापेक्षा इफ्तेकार यांची कारकीर्द मोठी होती आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढउतारांनी भरलेलं होतं. आताचे साल म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होय!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका

एका शापित राजहंसाची दास्तान..    


शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल.
त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन


इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.

बॉलिवूडमधल्या देशप्रेमाची ऐंशी वर्षे!


मागील दोन वर्षांपासून आपल्या देशात काही मोहिमा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राबवल्या गेल्यात. त्यात छुपे अजेंडे आहेत आणि आर्थिक स्वार्थाचे गणितही आहे, वर्चस्वाच्या साठमारीतून अशा कैक मोहिमा राबवल्या गेल्यात. या मोहिमांसाठी सोशल मीडिआचा वापर शस्त्रासारखा केला गेलाय. त्यात आयटीसेलचं चाळीस पैशांवर राबणारं भाडोत्री पब्लिक मोठ्या संख्यने कामी आलंय. द्वेष, तिरस्कार पसरवणं आणि त्याआडून वर्चस्वाची खेळी खेळत सामान्यांना हिंसेच्या आगडोंबात ढकलून देणं हे यामागचं प्रयॊजन होतं नि आहे. या मोहिमांपैकीच एक मोहीम होती - '#बॉयकॉट बॉलिवूड!'

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

तर आपली मान झुकलेली राहील..



आपण जर शरद पवार यांचे समर्थक असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या भाजपचा कट्टर विरोध करतात त्यांच्या नेत्यांशी वेळ येताच युती कशी काय करतात?

आपण जर आशिष शेलार, फडणवीस यांचे चाहते असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा प्रचंड तिरस्कार करतात त्यांच्याशी आघाडी कशी काय करतात?

आपण शिंदे, ठाकरे वा गांधी नि आणखी कुणाचे जरी समर्थक असलो तरी आपल्या पक्षाने ज्यांना विरोध केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याविषयी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत?
इथे मुद्दा एमसीएचा आहे त्यामुळे आपल्या चाणाक्ष नेत्यांचे उत्तर असते की आम्ही राजकारणातले विरोधक आहोत मात्र इथे खेळांत आम्ही मित्र आहोत!

मग एक सुजाण नि परिपक्व नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की खेळात राजकारण्यांचे काय काम? त्यांना त्यांतले नेमके काय ज्ञान वा अनुभव याचा सवाल पडला पाहिजे!

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

अजूनही जिवंत आहेत रोमन साम्राज्यातील राजप्रवृत्ती!

काही माणसं अधुरी असतात, त्यांची पात्रता एक असते आणि भलतेच काम ते करत राहतात. त्यांच्या आवडत्या प्रांतात त्यांना स्पेस लाभत नाही, त्याहीपलीकडे जाऊन काहींच्या वाट्याला अधिकचे भोग येतात. त्यांच्या नावावर अशा काही विलक्षण नकोशा गॊष्टींची नोंद होते ज्यात त्यांचा महत्वाचा रोल नसतो! रोमन सम्राट टायबिरिअस हा अशांचा शिरोमणी ठरावा. पराक्रमी रोमन सम्राट ऑगस्ट्स आणि विकृत रोमन सम्राट कॅलिगुला या दोघांच्या मधला कार्यकाळ टायबिरिअसच्या वाट्याला आला.

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

श्रद्धा वालकरच्या निमित्ताने - मुलींना समजून घेतलेच पाहिजे!



श्रद्धा वालकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. नोकरीत असताना तिची आफताब अमीन पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. आफताब अमीन पूनावाला हा देखील वसईचा रहिवासी आहे. वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झालेय. त्याने मुंबईतील एलएस रहेजा कॉलेजमधून बीएमएस पदवी घेतली. व्यवसायाने तो फूड ब्लॉगर आहे, तो इंस्टाग्रामवर ‘हंग्रीचोक्रो’ नावाने फूड ब्लॉग चालवतो.
मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत असताना लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाशी भेट झाली. आरोपी आफताब हा श्रद्धा जिथे राहत होती त्याच परिसरात राहत होता. मुंबईत काम करत असताना दोघांचे प्रेम झाले. श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

लोकसंस्कृतीचे परस्पर प्रेम - यात्रा आणि तमाशा


मराठी माणसाला मुळातच उत्सव आणि सणवारांचे अतिशय अप्रूप आहे. त्याच्या जोडीने हरेकाची कुलदैवते, ग्रामदैवते आणि कुळपुरूषांचे देवदेव इत्यादींचे सोहळे असतातच. याखेरीज विविध बुवा, महाराज, साधू बैरागी यांचेही उत्सव असतात, हे सर्व एकीकडे आणि गावोगावच्या यात्रा एकीकडे! यात्रा म्हटलं की गावाला नवं उधाण येतं, माणसं खडबडून कामाला लागतात आणि त्यांच्या जोडीला पंचक्रोशीतलं चराचर देखील कामाला लागतं. घरोघरी यात्रेचा खुमार वाढू लागतो.  साधारणतः यात्रांचेदेखील ठराविक मौसम असतात. मार्गशीर्ष संपून पौषाची चाहूल लागताच पाऊस आणि थंडी जोडीने येतात, हळूहळू पाऊस ओसरतो आणि थंडीचे साम्राज्य सुरू होते. याच हंगामात खेडोपाड्यांत जत्रा यात्रांचा मौसम  सुरु होतो. कुठे ग्रामदैवताची जत्रा भरते तर कुठे पीरबाबाचा उरूस भरतो. अद्यापही हे दोन्ही यात्रा उत्सव हिंदू मुस्लीम एकत्रितपणे साजरा करतात. कैक वर्षांपासून राज्यभरातील अनेक गावांत तशी परंपराच आता रूढ झाली आहे. आजकाल ज्या यात्रा साजऱ्या होतात त्यांचे स्वरूप आणि गतकाळातील स्वरूप यात प्रचंड फरक होता. गावकरी मंडळी आपआपल्या नातलगांना, पैपाहुण्यांना आवतण धाडतात. घरोघरी माणसांची लगबग वाढू लागते.  गल्ल्या माणसांनी फुलून जातात. फर्मास जेवणाचे बेत होतात, जेवणावळी होतात, पंगतीच्या पंगती उठतात. जिकडं तिकडं घमघमाट होतो. प्रत्यक्ष यात्रेच्या दिवसापर्यंत हा माहौल टिकून असतो. हे सर्व करण्यामागे भिन्न प्रकारच्या श्रद्धा असल्या तरी आजकाल आणखी एक कारण असते आणि ते म्हणजे यात्रांच्या निमित्ताने भेटी गाठी होतात सबब यात्रा जोरातच झाल्या पाहिजेत असा सूर सगळीकडे दिसतो. 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

नंदूची शाळा



प्राचार्य दत्तात्रेय कदम अत्यंत बेचैन होऊन एकसारखं मोबाईलवरून एक कॉल करत होते. पण फोन काही लागत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर एकदाचा त्यांचा फोन लागला. अधीर होऊन त्यांनी विचारलं, "काय साळे सर! केंव्हापासून प्रयत्न करतोय फोन लावायचा, पण काही केल्या कॉलच कनेक्ट होत नव्हता..."

त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत पलीकडून रामचंद्र साळे उद्गारले, "अहो सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. गावाकडे आता दर सांजच्याला हा घोटाळा होतोय."

त्यांना थांबवत कदमांनी पुन्हा आपलं संभाषण जिथून तुटलं होतं तिथून सुरु केलं, "ते असू द्यात. मला सांगा नंदूचं काय झालं? भेटला का तो? त्याच्या घरी गेला होतात का तुम्ही? त्याचे आजोबा भेटले का? काय अडचण काही कळलं की नाही? शेवटी काय ठरलं त्यांचं?" कदमांनी प्रश्नांची सरबत्तीच केली.

त्यांच्या प्रश्नांना दमाने घेत साळेंनी सगळी माहिती पुरवली. ती ऐकून कदमांचा चेहरा उतरला. ते उदास होऊन मटकन सोफ्यावर बसले आणि 'फोन ठेवतो साळे सर' म्हणत त्यांनी फोन कट केला.
इतक्या वेळापासून त्यांचं संभाषण ऐकत, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असणारा त्यांचा मुलगा सिद्धार्थ गोंधळून गेला. त्याने वडिलांच्या जवळ जात विचारलं, "बाबा काय झालं? नंदूच्या शाळेचं काही कळलं का? तुम्ही इतके उदास का झाले?" आपल्या चिमुरड्या मुलाचे ते कोमल उद्गार ऐकून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काही वेळ शांत राहून मग म्हणाले, "आता नंदूची शाळा बहुतेक कायमचीच बंद होणार की काय असे वाटू लागलेय."

टिकली, कुंकू आणि सुधा मूर्ती!



सुधा मूर्ती या विख्यात उद्योगपती नारायण मूर्तींच्या पत्नी आहेत. नारायण मूर्तींची 'इन्फोसिस' ही कंपनी आयटी क्षेत्रातील एक दिग्गज रोजगार निर्मिक आहे. 'इन्फोसिस'च्या तगड्या सात आकडी पगाराचे अनेकांना आकर्षण असते.मध्यमवर्गास आर्थिक सुबत्ता, आयुष्यभर वंचित राहावं लागलेल्या ऐश आरामी जीवनशैलीचं अत्यंत तीव्र नि छुपं आकर्षण असतं. त्यामुळे नारायण मूर्ती आणि तत्सम लोक यांच्यासाठी अत्यंत प्रातःस्मरणीय आदर्श असतात. वास्तवात या दांपत्याने औद्योगिक जगतात जे करून दाखवले आहे त्याला तोड नाही. आयटी सेक्टरमध्ये इन्फोसिसचा दबदबा अजूनही कायम आहे. या बाबतीत मूर्ती दांपत्य निश्चितच कौतुकास पात्र आहेत, त्यांचे हे कार्य उत्तुंग पातळीवरचे आहे हे कुणीही मान्य करेल.        

सुधा मूर्तींच्या संवादात, भाषणात वा व्यक्त होण्यात एक उल्लेख नेहमी येतो. तो म्हणजे आपल्या पतीच्या उद्योगासाठी आपले दागिने विकण्याच्या घटनेचा. जोडीनेच पतीच्या मेहनतीस सकारात्मक साद दिली वगैरे वगैरे.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

विधवा स्त्री भारतमाता नसते का?



"विधवा स्त्री भारतमाता नसते.
विधवेने कुंकू लावू नये!"
किती गरळ आहे यांच्या मनात!

23 जानेवारी 1664 रोजी शहाजी राजे निवर्तले.
6 जून 1674 रोजी शिवबांचा शपथविधी झाला तेंव्हा जिजाऊ मां साहेब हयात होत्या. राज्याभिषेकानंतर अकराच दिवसांत त्यांचे दुःखद निधन झाले.
शहाजी राजांच्या मागे उर्वरित दहा वर्षात वा पुढच्या इतिहासात त्यांचं महत्त्व कमी झालं का?
कधीच नाही!

आपण अजून मागे जाऊ या.
दशरथ राजाची पत्नी कैकेयी हिच्या अट्टाहासापायी राम, सीता, लक्ष्मण वनवासाला गेले. पुत्रविरहाने दशरथ राजे व्याकुळ होऊन मरण पावले.
दशरथांच्या पश्चात कौशल्येस हीन लेखले गेले का?
नाही!

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

जानकी के लिए ..

sameerbapu
जानकी के लिए..  

देह गतप्राण झलाय रावणाचा 
स्तब्ध झालीय लंका सारी
सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी
कुठे कसला उत्साह नाही
नाही तेवला दिवा कुणाच्या घरी
घर बिभिषणाचे वगळता!

समुद्र किनारी बसलेले विजयी राम
बिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेत
जेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेक
सातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेत
आपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेत
चरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान!

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

तो रडला तेंव्हा.. @रॉजर फेडरर




आपल्याकडे एक समज आहे की फक्त लहानगी चिमुरडीच हमसून हमसून रडतात. बहुत करून मोठ्यांचं रडणं हे रुमालाने डोळ्यांच्या कडा पुसून घेणारं असतं वा एखाद्या दुसऱ्याचा आवेग जास्तीचा असेल तर एखादा हुंदका येतो नि कढ सरतात.मात्र परवा त्याला रडताना पाहिलं आणि नकळत मीही रडलो!इतकं काय होतं त्याच्या अश्रुंमध्ये? त्यातली सच्चाई, त्यातलं नितळ प्रेम, शालीनता, नम्रता आणि वात्सल्य हे सारं थेट मनाला भिडणारं होतं. होय मी रॉजर फेडररबद्दलच बोलतोय!

फेडररने त्याची निवृत्ती १५ सप्टेंबरलाच जाहीर केली होती. निवृत्तीविषयीच्या घोषणेचा त्याचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांत जगभर व्हायरल झाला होता. आपल्या मोठेपणाचा कुठलाही अभिनिवेश त्यात जाणवत नव्हता. त्यात आत्मप्रौढीचा लवलेशही नव्हता.

त्याची निवृत्ती रॉलें गॅरो वर किंवा विम्बल्डनसारख्या मोठ्या विख्यात मैदानांवर होईल असे वाटले होते. मात्र निवृत्तीसाठी त्याने निवडलेली स्पर्धाच मुळात तुलनेने काहीशा बारीक परिघाची होती!
रॉड लेव्हर कप स्पर्धेत त्याने निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं.
चकचकाट आणि झगमगाट कमी असलेली ही स्पर्धा त्याने निवडली तेंव्हाच त्याचं हळवं मन ठळकपणे समोर आलं होतं. या स्पर्धेत जागतिक पातळीवरचे आताचे बिनीचे तरुण खेळाडू आणि आपला कट्टर पारंपारिक जुनाच प्रतिस्पर्धी हजर असणार होते.
शिवाय ज्या प्रेक्षकांनी त्याला दोन दशकाहुन अधिक काळासाठी सातत्याने पाठींबा दिला ते ही तिथं उपस्थित असणार होते.
याहून भारी गोष्ट त्याच्या अखेरच्या मॅचची आहे!

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

वो जो हम में तुम में क़रार था .. - मोमीनची भळभळती जखम




अनेकदा असे वाटते की अंतःकरणापासून लिहिलेल्या हरेक कवितेला, गझलेला एक पार्श्वभूमी असावी.
'वो जो हम हम में तुम में करार बाकी था..'या गझलेविषयी असेच काही वाटत आलेय.
ही गझल लिहिलीय मोमीन ख़ान मोमीन यांनी.
 
मोमीन यांचे वडील गुलाम नबी खान हे पेशाने हकीम होते. कोवळ्या वयातच मोमीनला आपल्या कौटुंबिक व्यवसायाचे बाळकडू मिळाले. तारुण्यात पदार्पण करताच त्यांनी आपला पारपांरिक पेशा स्वीकारला. मात्र त्यांचे मन त्यात लागत नव्हते.
तो काळ ग़ालिब आणि ज़ौक़ यांचा होता. युवा मोमीनचे मन त्यांच्या शायरीकडे ओढ घेई. त्याचा ओढा कवितेकडे अधिक होता.
अस्सल प्रेम अनुभवल्याशिवाय वा प्रेमात धोका खाल्ल्याशिवाय शायरीला खऱ्या अर्थाने वजन प्राप्त होत नाही असं आजही मानलं जातं. मोमीनच्या मनातले प्रेमपाखरू भिरभिरण्याआधीच त्यांचा निकाह झाला.

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

देश म्हणजे कागदाचा नकाशा नसतो - देश कागज पर बना नक्शा नहीं होता



जर तुमच्या घराच्याएका खोलीत आग लागली असेल
तर तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकता का?
जर तुमच्या घराच्या
एका खोलीत प्रेतं
सडत असतील
तरी ही तुम्ही
दुसऱ्या खोलीत प्रार्थना करू शकता का?
जर उत्तर होय असेल
तर मला तुमच्याशी
काही बोलायचे नाही.

देश म्हणजे कागदावर बनवलेला
नकाशा नसतो
ज्यातला एक भाग फाटला गेला तरी
बाकी भाग तसेच शाबूत राहतील
आणि नद्या, पर्वत, शहर, गाव
पूर्ववत आपल्याच जागी दिसतील
खिन्न नसतील.
जर तुम्ही असं मानत नसाल
तर मला तुमच्या सोबत
राहायचे नाही.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

दिखाई दिये यूं कि बेखुद किया - 'बाजार'च्या काही नोंदी

काही इच्छा असतात अर्ध्या राहिलेल्या, काही व्यथा असतात ज्यांना कुणी जाणलेलं नसतं. काही चेहरे असतात ज्यांना कुणी वाचलेलं नसतं, काही पुस्तके अशीच मिटलेली राहून जातात ज्यांची पाने कुणी उघडलेलीच नसतात आणि काही स्वप्ने असतात आयुष्याच्या अर्ध्यामुर्ध्या टप्प्यावर अवेळी आलेल्या पावसातल्या पाण्यात कागदी नावेबरोबर सोडून दिलेली!

हरेकाच्या आयुष्यात खूप काही निसटून गेलेलं असतं, आयुष्य संपत आलं तरी जगणं खऱ्या अर्थाने बरंचसं बाकी असतं!

साधीसुधी माणसं कथाविषय होती. त्यांचे सरळसाधे गुंते होते. निरलस मने आणि नितळ संघर्ष. लेपविरहित चेहरे, ओढाळ गाणी. शांत रात्री नि बेजान दिवस यांचं कॉम्बीनेशन असणारी तरल आयुष्ये. डामडौल नसणारा भवताल आणि डोळ्यांची भाषा बोलणारी कॅरेक्टर्स, न कसला कोलाहल ना कुठला प्रबोधनाचा बाज, सरळसुबक मांडणी! यांची गुंफण असणाऱ्या निव्वळ सरस जीवनकथा! केवळ उत्तुंग हिमशिखरांना पाहूनच छाती भरून येते असं काही नसतं काही गवताची पातीही अशी टोकदार नि चिवट असतात की त्यांनीही मन भरून येतं.

अभिव्यक्तीचे विद्रुपीकरण करणारे 'अनसोशल' अल्गोरिदम...

इथे सातत्याने केवळ राजकीय भूमिका मांडणाऱ्या मंडळींना त्याचा स्ट्रेसदेखील येत असतो. तब्येतीवर त्याचे साधकबाधक परिणामही होतात. अनेकांच्या अकाली अकस्मात जाण्यात या गोष्टी हातभार लावतात. मागील काही वर्षात अशी अनेक मित्रमंडळी पाहिली आहेत. तुम्हीदेखील केवळ नि केवळ राजकीय भूमिका इथे मांडत असाल वा तुमच्या मित्रयादीत केवळ राजकीय पालख्या उचलणारे भोई असतील तर तुम्ही हे वाचावं.

इथं सोशल मीडियावर राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की फेसबुकच्या अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडी निवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्यसंस्कृती, वस्त्रांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱ्या नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम फेसबुक करते.

सोशल मीडिया, वाचन आणि पुस्तकांचा खप - नवे परस्परावलंबी सूत्र

या विषयावर बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरील पुस्तक विषयक चर्चा वा पुस्तकांच्या अनुषंगाने इथे होणारा लेखन संवाद यांना केंद्रस्थानी ठेऊन काही निष्कर्ष वा मते मांडली आहेत. तर काहींनी इथे कोणत्या पद्धतीचे वाचन जास्त पसंत केले जाते, कोणत्या लेखन शैलीकडे युजर्सचा कल आहे, सोशलमीडिया युजर्स कोणत्या लेखकांना अधिक पसंत करतात वा कोणत्या लेखकांवर / पुस्तकांवर बोलतात, कुठल्या कालखंडातील पुस्तके अजूनही वाचली जातात, कोणत्या लेखकांचा साधा नामोल्लेखही होत नाही वा कोणत्या वर्गवारीतील पुस्तकांविषयी किमान चर्चा देखील केली जात नाही इत्यादी मुद्द्यांवर मत प्रकटन केलं आहे.

*** *****

सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील.

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

भितीवर विजय - 'द कराटे किड'चे सार



'द कराटे किड' २०१० मध्ये रिलीज झाला होता. त्याने तिकीटबारीवर तुफान टांकसाळ खोलली. जॅकी चेन आणि जेडन स्मिथच्या मुख्य भूमिका त्यात होत्या.
एका शाळकरी मुलाचं भावविश्व त्यात अत्यंत भेदक पद्धतीने साकारलं होतं.

कोवळया ड्रे पार्करच्या विधवा आईची शेरीची कार कंपनीत बदली होते.
ती डेट्रॉईटवरून थेट चीनमध्ये दाखल होते.
खरे तर ड्रे पार्कर डेट्रॉईटमध्येच झळाळून उठला असता, पण तसे घडत नाही.
चीनमध्ये आल्यानंतर त्याला त्याच्या वेगळेपणाचं, बॉडी शेमिंगचं शिकार व्हावं लागतं.

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

'तो' अखेरचा माणूस मेला तेंव्हा..


मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही वा त्याच्याविषयी त्रोटक माहितीशिवाय काहीच ठाऊक नाही. तरीही तो मरण पावल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ वाटलं.त्याच्या मृतदेहापाशी एका ब्राझीलियन पक्षाचे पंख आढळलेत, कदाचित आपला इथला प्रवास संपला असल्याची जाणीव त्याला झाली असावी.
ते पंख त्याला कुठे घेऊन जाणार होते हे त्यालाच ठाऊक असावे!
की त्याला ते पंख कुणाला द्यायचे होते?
की त्या पंखांना आपल्या अंतिम क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यानं सोबत ठेवलं असावं?
काय वाटलं असेल त्याला एकट्याने मरताना?

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

जेंव्हा मृत्यू हवा असतो..

एक असतो मृत्यूदूत. त्याचं काम असतं जीवांना मृत्यू बहाल करण्याचं.


तो फिरतो जंगलांतून, माळांमधून. असो ससा की असो गरुड, कोल्हा वा कुणी वन्य जीव.
हरेकास त्याच्या नुसत्या स्पर्शाने यायचा मृत्यू.
एकदा त्याच्या मोहिमेवर असताना दिसतं त्याला एक कोवळं देखणं तरतरीत हरीण. तो जातॊ हरिणापाशी त्याला स्पर्श करण्यास.
कसा कुणास ठाऊक पण हरणास लागतो सुगावा मृत्यूदूताच्या हेतूचा, तो जवळ येण्याआधीच सावध होतं हरीण.
त्याच्याकडे नजर देत पाहतं, क्षणेक थबकून उभं राहतं नि धूम ठोकून पळून जातं.

त्याच्या डोळ्यातली जगण्याची आशा नि मृत्यूची भीती पाहून मृत्यूदूतास येते निराशा. तो पाहू लागतो स्वतःच्याच हातांकडे.
आपण इतके कसे वाईट आहोत मनी येतो विचार त्याच्या.
न राहवून तो हरणाच्या दिशेने उडत जातो माग काढत. हरीण गेलेलं असतं त्याच्या कळपात हुंदडायला.
दुरून त्याला पाहताना मृत्यूदूताचा हात लागतो झाडांच्या पानांना, पाने जातात करपून सुकून!
वाईट वाटते मृत्यूदूताला.
तो तिथेच राहतो रेंगाळून.

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

तू कायम जिवंत असशील!

मुंबईत तुला भेटायला आलेलो तर
तू निघून गेलेली.
मध्ये एकदा तू भलतीकडेच भेटलीस
विलक्षण म्लान थकलेली,
तू नाव बदलले होतेस.
 
खरे सांगायचे म्हटलं तर
तू पुरती संपत आलेली..
माझा पडेल चेहरा पाहून
डोळ्यातलं पाणी लपवत म्हणालीस
इट्स ओके,
आणखी काही दिवस तरी असेन ना..
 
खूप दिवस झाले या भेटीला
पुन्हा तुझी चौकशी नाही केली मी
 
निदान माझ्या स्मृतीत तरी तू कायम जिवंत असशील!

- समीर गायकवाड.

❤🤎🖤

कवितेच्या नोंदी - 

काही शोध न संपलेलेच बरे असतात. शोध पुरे होतात आणि शोकाच्या डागण्या कायमस्वरूपी राहतात.
आपलं जीवश्च कंठश्च माणूस मरणपंथाला लागलेलं असतं. आपण असहाय असतो, त्याच्यासाठी काही करावं असं वाटत असतं मात्र तो जीव दुनियेच्या गर्दीत नाहीसा होतो. मग कुठे जरी चौकशी केली तरी ती वाईट बातमीच कळणार असते, अशा वेळी विचारपूस न केलेली बरी, निदान ते जीवाचं माणूस आपल्या विश्वात तरी सचेत असतं. सगळ्याच जिवाची किंमत सर्वांनाच नसते!

खऱ्या घटनेत न राहवून तिची चौकशी केली तर सारं संपलेलं होतं. हैदराबादला तिचा ठावठिकाणा असल्याचं कळलेलं. तिथेही तिने नाव बदललं होतं, त्याच्यासाठी! तिचा मृत्यू होऊन दीडेक वर्ष झालेलं. हा तिथे गेला, तिची कबर तरी पाहता येईल म्हणून कबरस्तानमध्येही गेला. मात्र तिथे नुकतीच माती खालीवर केलेली. आपल्याला दहन केलं तर आपल्या अस्थीदेखील कुठे तरी विसर्जित केल्या जातील म्हणून तिने नाव बदललेलं. शेवटी तिच्या अस्थीदेखील मिळाल्या नाहीत. असहाय अवस्थेत आलेलं बेवारसासारखं मरण कवटाळून ती गेली. मृत्यूआधी तीन आठवडे निपचित पडून होती मात्र अखेरच्या क्षणी पूर्ण ताकद एकवटून तिने याचंच नाव घेतलेलं. मग दोन आचके नि खेळ खल्लास. आता त्याला वाटतं की तिची विचारपूस केली नसती तर बरे झाले असते. काही दुःखे काळजात खोल खोल रुततात!

आपल्या सर्वांना निदान रक्ताची माणसं, मित्र, नातलग तरी असतात मात्र ज्यांचं कुणीच नसतं त्यांच्यातलं कुणी असं मरणपंथाला लागल्यावर त्या व्यक्तीच्या मनात गतकाळात आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांच्या भेटीची अनिवार इच्छा असते, किमान एक क्षणतरी हव्याशा व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःला पाहावं आणि मग श्वास सोडावेत असं वाटत असतं. ही तगमग मी पाहिलीय. खोटं बोलून आपणच तिच्या हातात हात द्यायचा, ग्लानीत असणाऱ्या जीवाला वाटतं 'तो'च आलाय! मग त्या जिवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहू लागतात आणि काही क्षणातच तो जीव हे जग सोडून गेलेला असतो, मरतुकड्या अशक्त हातात आपला हात घट्ट धरून! अशांचे मरणसोहळे होत नाहीत नि त्यांच्यासाठी कुणी रडत नाही. मग घट्ट धरलेल्या हाताचे ठसे अनेक वर्ष आपल्याला एकट्यालाच दिसत असतात! हे फार भीषण दुःखद असतं!

आजाराने ग्रासलेल्या एखाद्या अश्राप जीवाच्या अकाली जाण्याची बातमी आपल्या कानी येऊ नये अशीच बहुतेकांची इच्छा असते. तिकडून एखादा फोन आला तरी तो घ्यावा वाटत नाही. मेसेज आला तर वाचला जात नाही. एखाद्याचं असणं आधारदायी असतं, आजारी असलं म्हणून काय झालं आपलं माणूस हयात आहे याचंही एक सुख असतं. त्यातलीच ही एक चटका लावून गेलेली एक्झिट, जिचा मी कधीच सामना करु शकलो नाही...

गुरुवार, २१ जुलै, २०२२

आखरी ख्वाहिश..

नगमाच्या अड्ड्यासमोरून दर शुक्रवारी एक फकीर जायचा, ती त्याला कधीच काही देत नसे. बदनाम गल्लीत फकिराचे काय काम असं ती म्हणायची. त्याच्याकडे पाहताच लक्षात यायचे की त्याची दृष्टी शून्यात हरवलेली आहे. तो बऱ्यापैकी अकाली प्रौढ वाटायचा.
तिने किंमत दिली नाही तरीही तो मात्र तिच्या समोर आशाळभूतागत उभं राहायचा. तिला बरकत यावी म्हणून अल्लाहकडे दुआ करायचा, हातातलं मोरपीस तिच्या मस्तकावरून फिरवायचा.
अत्तराचा फाया देण्याचा प्रयत्न करायचा.
ती त्याला अक्षरशः झिडकारून टाकायची. जिना उतरून खाली जाताना तो हमखास तिच्याकडे वळून पाहायचा. चाळीशीतला असावा तो. तो येण्याची खूण म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या फायाचा मंद दरवळ!

एकदा नगमाने ठरवले की त्याला धक्के मारून हाकलून द्यायचे मात्र त्याआधी त्याला आखरी इशारा द्यायचा.
ठरवल्याप्रमाणे पुढच्या जुम्माबरोजच्या दिवशी तिने त्याला अत्यंत कडव्या भाषेत सुनावले.
तिने इतकं काही भलंबुरं सूनवूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.
अगदी निर्विकारपणे तो उभा होता, जणू काही त्याचं काही नातं होतं!
बऱ्याच वेळाने तो तिच्या दारासमोरून हलला आणि कधी नव्हे ते त्याने सज्ज्यावरच्या सगळ्या खोल्यात जाऊन सगळ्याच बायकांसाठी इबादत केली,
कुणी काही दिले तरी घेतले नाही.
एरव्हीही तो काही घेत नसे.
फारतर एखाद्या पोरीने आग्रह केला तर तिच्या दारात बसून चार तुकडे जरूर मोडायचा.
तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण करुण भाव असत.

मंगळवार, १२ जुलै, २०२२

शिंजो आबे यांची हत्या आणि चीन जपान वैमनस्य ..

नुकतेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जगभरात याचे तीव्र पडसाद 
उमटले. हेच चित्र सर्वत्र दिसले अपवाद होता चीनचा! आबेंच्या हत्येनंतर चीनी सोशल मीडियावर अक्षरशः दिवाळी साजरी केली गेली. 'वन प्लेट मोअर राईस' असं म्हणत चिन्यांनी वाढीव कल्ला केला. चिनी इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी आबेंचा मारेकरी यामागामीचा गौरव करत त्याला हिरो म्हटलंय. जगभरातल्या माध्यमांनी चिनी विकृतीची दखल घेतली. खुद्द चीनने मात्र याविषयी ठोस भूमिका न घेता लोकभावनांना एकप्रकारे मूक संमतीच दिली. अनेकांनी चिनी मानसिकतेमागची कारणमीमांसा मांडली. त्यांचा सूर असा होता की, शिंजो आबे हे चीनसाठी मोठे आव्हान बनले होते. आबे हे चीनच्या धोरणांचे कट्टर विरोधक मानले जायेच. आबेंच्या पुढाकाराने चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्वाड हा समूह सुरु झाल्यावर चीनचा तिळपापड झाला होता. आबेंनी चीनच्या महत्वाकांक्षी 'ओबोर' या बहुराष्ट्रीय रस्ते प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यामूळे आबे चिन्यांच्या डोळ्यात सलत होते. वास्तवात चीन जपानमधलं वैमनस्य अधिक गहिरं, जुनं नि कडवट आहे ज्याबद्दल भारतीय माध्यमे क्वचित लिहितात. अशी मांडणी अप्रत्यक्षपणे चीनची बाजू घेण्यासारखे असले तरी हा इतिहास आहे जो बदलता येणार नाही.

रविवार, १० जुलै, २०२२

बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.

गुरुवार, ७ जुलै, २०२२

क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या

क्रिप्टोक्वीन रुजा इग्नाटोवा

सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि 
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक  स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे  पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ  आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो  परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार  असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !

मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.

रविवार, २६ जून, २०२२

खऱ्या समानतेच्या शोधात..


'जातीसाठी माती खावी' किंवा 'जात नाही ती जात' ह्या आपल्याकडच्या पॉप्युलर टॅगलाईन्स आहेत. एकीकडे सातत्याने जातीयवादाविरुद्ध कंठशोष करायचा आणि त्याचवेळी हस्ते परहस्ते आपल्या जातीच्या 'अहं'ला गोंजारत रहायचं ही भारतीय माणसाची खासियत बनून गेलीय. सद्यकाळात आपले विचार आपल्या व्यक्तीमत्वाइतके दुभंगत चाललेत हे कटूसत्य आहे, गतशतकातली जातीनिर्मूलनाची साधीसोपी चळवळ आपण पूर्णतः स्वीकारू शकलो नाही हे वास्तव आहे. मागील आठ शतकांत अगदी संतपरंपरेपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंत अनेकांनी यावर प्रबोधन केले आहे मात्र आपल्यावर त्याचा परिणाम शून्य झालाय. गत शतकात वा अगदी या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत लोकांच्या वागणुकीत जातीयता स्पष्ट दिसून यायची, त्यावर प्रहार करणं सोपं असायचं. लोक याची दखल घेत असत, अगदी राजसत्तेपासून ते मीडियापर्यंत याची नोंद घेतली जायची. परिणामी जे जातीभेद करत असत ते अगदी उघडे पडत असत, अशांची बाजू घ्यायला फार कुणी पुढे येत नसत. अर्थातच अशांना समर्थन देण्याची खुमखुमी काहींच्या ठायी असायची मात्र लोकलज्जेस्तव तसेच वाढत्या सामाजिक दबावापुढे असे लोक वचकून राहत आणि जातीभेद करणाऱ्याला खुले समर्थन मिळत नसे.

मंगळवार, ७ जून, २०२२

जॉली एलएलबी व्हाया सीबीआय

#sameerbapu, sameerbapu, समीर गायकवाड, sameer gaikwad
बदामीदेवी त्यांच्या नातलगांसह न्यायालयात आल्या तो क्षण ...   

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटामध्ली ऍडव्होकेट जगदीश त्यागीची मध्यवर्ती भूमिका अभिनेता अर्शद वारसी याने साकारली होती. या चित्रपटाला भरपूर यश लाभले होते खेरीज क्रिटिक्सचे उत्तम शेरे मिळाले होते. त्यानंतर चारच वर्षात याचा सिक्वेल देखील निघाला होता ज्यात अक्षयकुमार नायकाच्या भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे कोर्टरूम ड्रामा होते. एका हिट अँड रन केसमध्ये एक अमीरजादा मस्तवाल मद्यधुंद तरुण आपल्या अलिशान गाडीखाली सहा लोकांना चिरडून मौका ए वारदात वरून पळून जातो. फुटपाथवर झोपलेले जीव निष्कारण बळी पडतात. मात्र व्यवस्था इथे अपराध्याच्या बाजूने उभी राहते त्यासाठी बरेच मोठे आर्थिक व्यवहार होतात, जीवांची बोली लागते अन सौदे होतात. वकिलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळी तपास यंत्रणा यात सामील असते. सगळ्यांचे उखळ पांढरे होते, कारण जे मृत्युमुखी पडलेले असतात तेच मुळात बेसहारा असहाय गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी कोण लढणार ? मुळात यात सहाजणांचा मृत्यू झालेलाच नसतो, पाच जण जागीच ठार झालेले असतात आणि रमाकांत शुक्ला नावाचा अपंग गंभीर जखमी झालेला असतो. वास्तवात तो एकटाच या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, गाडी चालवणाऱ्या राहुल दिवाणने त्याची मदत करण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यात रमाकांत बचावतो मात्र इन्स्पेक्टर सतबीर राठीच्या कचाट्यात सापडतो. त्याची आयुष्यभराची कमाई हडप करून राठी त्याला हाकलून लावतो, जोडीस सज्जड दम भरतो. रमाकांत शुक्ला हा देखील अपघातात मरण पावल्याची नोंद करून मोकळा होतो. अपघातातील मृतांची संख्या पाचऐवजी सहा होते ! खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात गबरगंड वकील तेजिंदर राजपाल त्यांना हव्या त्या दिशेने तपास वाकवतात ! मात्र जगदीश त्यागी अगदी ऐन मोक्याच्या समयी रमाकांत शुक्लाला हजर करतो. ज्याला व्यवस्थेने मृत घोषित केलेले असते तो स्वतः चालत येऊन न्यायालयात साक्ष देतो आणि मग कुठे खरा न्याय होतो अशी कथा 'जॉली एलएलबी'मध्ये होती. हे सर्व इथे का लिहिलेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण हा काही सिनेमाविषयक लेखनाचा स्तंभ नाहीये हे सर्वश्रुत आहे. मात्र घटनाच अशी घडली आहे की या चित्रपटाची आठवण व्हावी ! व्यवस्थेने मृत जाहीर केलेली वयाची ऐंशी वर्षे पार केलेली एक वृद्धा थेट न्यायालयात अवतरते आणि न्यायमूर्तींना खऱ्या न्यायासाठी विनवणी करते, ही घटना या शुक्रवारी ३ जून रोजी घडलीय ! बातम्यांच्या गदारोळात या घटनेची नोंद नीट घेतली गेलेली नाही कारण एका वृद्ध निराधार शोषित महिलेसाठी मीडिया रान पेटवेल असे दिवस आता राहिले नाहीत. त्याच घटनेचा हा धांडोळा.

मंगळवार, २४ मे, २०२२

फिलिपिन्समधील निवडणुकांचे धक्कादायक वास्तव..

#sameerbapu, sameergaikwad, sameerbapu, समीर गायकवाड
मार्कोस ज्युनियर यांच्या विजयाचे अन्वयार्थ काय लावायचे ? 

नुकत्याच पार पडलेल्या फिलिपिन्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा विराट विजय होताच चीनी प्रसारमाध्यमांना आनंदाचे भरते आले. चीनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या झिन्हुआचा खुनशी उन्माद बातम्यांच्या शीर्षकांतून ओसंडून वाहत होता तर ग्लोबल टाईम्स या अन्य एका सरकारी नियंत्रित दैनिकात देखील याचे वार्तांकन करताना जो बिडेन यांच्या नावाने मल्लिनाथी करण्यात आली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने काहीशी सौम्य भूमिका घेत झिन्हुआची री ओढली होती. ग्लोबल टाईम्समध्ये हर्मन टीयू लॉरेल यांनी लिहिलं की मार्कोस ज्युनिअर हे आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावरून वाटचाल करताना चीनशी असलेले संबंध बळकट करतील आणि आपल्या पद्धतीने फिलिपिन्सला आकार देतील ! लॉरेल हे सामान्य लेखक नाहीत, ते फिलिपिनो थिंक टॅंक म्हणून विख्यात आहेत, फिलिपिनो ब्रिक्स स्ट्रॅटेजीचे ते संस्थापक आहेत, फिलिपिन्सच्या सरकारी मीडियामध्ये ते माध्यमकर्मी आहेत, त्यांना तिथल्या राजकारणाचे बारकावे उत्तम ठाऊक आहेत. हे पाहू जाता त्यांच्या भाष्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फिलिपिन्स हा बेटांचा समूह असणारा देश जगाच्या नकाशाच्या दृष्टीने छोटासा असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. तिथली बदलती राजकीय गणिते कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी मार्कोस ज्युनियर यांचा पूर्वेतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त आहे.