बॉलीवूड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बॉलीवूड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे..



हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात. आता असे वातावरण झालेय की हिंदी चित्रपटसृष्टीच्या नियमित प्रेक्षकांनाही पुढचा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणता पहायचा आहे हे आठवावं लागतं. कारण मोजके अपवाद सोडल्यास या वर्षात 
आतापर्यंत जे छोटे-मोठे हिंदी चित्रपट आले आहेत, त्यांचे नशीब गुणवत्तेच्या आणि कलेक्शनच्या बाबतीत सर्वश्रुत आहे. बॉलीवूडचा शेवटचा फील-गुड चित्रपट कोणता होता किंवा ज्याच्या कलेक्शनची खूप चर्चा झाली होती असा चित्रपट लक्षात ठेवणे कठीण झालेय हे वास्तव आहे. त्या तुलनेत जर दक्षिणेच्या चित्रपटांबद्दल बोललो तर लगेचच 'RRR', 'KGF 2' आणि 'पुष्पा: द राइज' ही नावे समोर येतात. या चित्रपटांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे याची अलिकडे सातत्याने चर्चा होतेय. सिनेसृष्टीत दक्षिणोत्तर जे  काही घडते आहे त्यावर व बॉलीवूडमधल्या त्रुटींवर फोकस केला जातोय हे उत्तमच आहे मात्र काही प्रश्न चर्चेतून गायब आहेत जसे की दक्षिणेकडील ज्या चित्रपटांनी सणकून मार खाल्ला असे चित्रपट उत्तरेकडे चांगला व्यवसाय करतील का किंवा दक्षिणेकडे अपयशी ठरलेल्या चित्रपटांचे हिंदी रिमेक्स यशस्वी होतील का? दक्षिणेकडचे सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होताहेत का? तिकडच्या फ्लॉप सिनेमांची टक्केवारी किती आहे? असे मुद्दे चर्चेत नसतात! खरे तर यांची चर्चा झाली तर नेमके चित्र समोर येऊ शकते मात्र आपली माध्यमे अशी चर्चा करण्यात निरुत्साही दिसतात. किंबहुना ही मांडणीदेखील केली जात नाही. बॉलीवूडविरोधात सातत्याने बॉयकॉट मोहिमा चालवत असताना दक्षिणेकडील केवळ छप्परफाड यशाचेच गोडवे गायचे नि तिकडच्या 
समीरबापू
अपयशाविषयी मौन राहायचे असा एक फंडा सर्वत्र दिसतोय. याला राजकीय, आर्थिक, समाजिक नि धार्मिक कंगोरे असल्याने खरे स्वरूप समोर येणे तूर्तास कठीण दिसतेय हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडेही मोठ्या संख्येने सिनेमे कोसळत आहेत. तिकडच्या सिनेनिर्मात्यांनी धास्ती घेऊन मध्यंतरी थेट ओटीटीवरच प्रदर्शित करण्याचा सपाटा लावला. परिणामी थिएटर्स ओस पडली, चित्रपटसृष्टीच्या तंत्रज्ञ मंडळींनाही फटका बसला; चित्रपट निर्मितीसह वितरणव्यवस्थेतही बेफाम बदल झाले त्यामुळे अपवाद वगळता सगळ्यांचे पेकाट मोडायच्या बेतात आले. याविरोधात आंदोलन उभं राहिलं, चक्क स्टुडिओ बंद ठेवले गेले, महिनाभर चित्रपटनिर्मिती बंद पडली वा पुढे ढकलली गेली. अर्थात ज्या सिनेमांनी तिकीटबारीवर टाकसाळ खोलली होती त्याच्या निर्मात्यांनी सावध भूमिका घेतली. मग काही दिवसांनी सारं सुरळीत झाल्याचा देखावा केला गेला. चित्रपट निर्मिती पुन्हा सुरु झाली मात्र मूळ दुखणे कमीअधिक फरकाने बदललेल्या स्वरुपात तसेच राहिले. हा विषय माध्यमांत फारसा चर्चेस आलाच नाही मात्र ज्या मोजक्या सिनेमांनी अफाट यश मिळवले होते त्यांचीच चर्चा अधिक झाली. दक्षिणेकडील फ्लॉप्सची नोंद घेतली तरीही हिंदी सिनेमाच्या यशाच्या उतरत्या आलेखाची कड घेता येत नाही हे वास्तव आहे.

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

हम भी अगर बच्चे होते!

सन ऑफ इंडिया 

हिंदी चित्रपटसृष्टीने सर्वच वयोगटातील पात्रांना ग्लॅमर दिलेय, त्यांच्या भूमिकांना स्वतंत्र स्पेस दिलीय. हरेक वयाच्या कलाकारांना किर्ती मिळवून देताना हिंदी सिनेमा नित्य नव्या उंचीवर जात राहिलाय. कलाकारांनी देखील आपल्याला 
चाची 420 
मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाट्याला आलेल्या कॅरेक्टर्सना न्याय दिला. नायिका, नायकापासून ते खलनायकांपर्यंतच्या आलेखाचा आढावा घेताना बालकिशोरांच जगही सिनेमाने ध्यानात घेतल्याचे दिसते. देशात बालचित्रपटांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळालेले नाही हे जरी मान्य केले तरी बालमित्रांच्या जगास बहिष्कृतही केलेलं नाही हे ही खरेय. मुलांवर बनवलेले चित्रपट कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले गेलेत. इतर भारतीय भाषांपेक्षा हिंदीत बालचित्रपटांची निर्मिती जास्त झालीय. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत निर्मात्यांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून बालचित्रपट तयार केले आहेत. हे सिनेमे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर मुलांशी संबंधित समस्यांकडेही लक्ष वेधतात. 1980 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट एका अदृश्य माणसावर बनवला गेला होता पण त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू ही मुले होती. हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. 'तारे जमीन पर', 'मकडी', 'नन्हे जेसलमेर', 'इक्बाल', 'ब्लू अंब्रेला', 'जजंत्रम ममंत्रम', 'अपना आसमान', 'मेरे प्यारे प्राइम  मिनिस्टर', 'भूतनाथ', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बम बम बोले' आदी बालचित्रपटांनी बालचित्रपटाची संकल्पना थोडी बदललीय. नव्या संवेदनेवर निर्मिले गेलेले हे चित्रपट शक्यअशक्यतेचा नवा पट उभा करतात. या चित्रपटांमध्ये मानवी नातेसंबंध आणि सहवास भावना, मुलांच्या समस्या मोठ्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्याने चित्रित केल्यात. बालपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतानाच कधी त्यातली गंमत, कधी त्यांची भीती, कधी त्यांची निरागसता तर कधी त्यांची आंतरिक धडपड चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चित्रपट असेही आहेत जे विशेषतः मिलेनियल किड्सच्या आधीच्या पिढीशी बोलतात.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

गजब माणूस - इफ़्तिख़ार


हिंदी सिनेमाच्या कथा, पटकथांमध्ये अनेक तऱ्हेची पात्रे आढळतात. नायक, नायिका, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री, विनोदवीर, चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते आणि खलनायक ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. यांच्या जोडीने विविध छोटयामोठ्या भूमिका कथेच्या मागणीनुसार सिनेमात दिसतात. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, दुकानदार, पोलीस इन्स्पेक्टर - कमिशनर ही पात्रे बऱ्याच सिनेमात आढळतात, पैकी पोलीस इन्स्पेक्टरचे पात्र अधिक प्रमाणात आढळतं. मुदलात एकूण सिनेमाच्या दोन अडीच तासांच्या लांबीत हे रोल अवघ्या काही मिनिटांचे असतात. मात्र तरीदेखील या भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे काही अभिनेते होऊन गेले. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेले पोलिसी पात्र इतके खरेखुरे वाटायचे की हा इसम खरोखरच्या जीवनात पोलीस आहे की काय वाटावे! सत्तर एमएमच्या सिनेमास्कोप पडद्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्र्या नायक नायिका म्हणून आपला ठसा उमटवू शकले नाहीत मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पोलिसाच्या भूमिका करून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर होण्याची जादू काहींनी साधली! हे कशामुळे शक्य झाले याचे उत्तर एकच येते ते म्हणजे या अभिनेत्यांची आपल्या कामावरची निष्ठा आणि रसिक प्रेक्षकांचे त्यांच्यावरचे अपार प्रेम! नायक नायिकांना मिळणारे ग्लोरिफिकेशन या अभिनेत्यांच्या वाट्याला आलं! कोणताही रोल छोटा नसतो आणि कोणताही अभिनेता मामुली नसतो, तो ज्या भुमिकेत प्राण फुंकतो ती भूमिका सजीव होते हे नक्की! या वर्गातली हिंदी सिनेमाच्या इतिहासातली दोन ख्यातनाम नावं म्हणजे जगदीश राज आणि इफ्तेकार! जगदीश राज यांच्यापेक्षा इफ्तेकार यांची कारकीर्द मोठी होती आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढउतारांनी भरलेलं होतं. आताचे साल म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होय!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका

एका शापित राजहंसाची दास्तान..    


शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल.
त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

बॉलिवूडमधल्या देशप्रेमाची ऐंशी वर्षे!


मागील दोन वर्षांपासून आपल्या देशात काही मोहिमा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राबवल्या गेल्यात. त्यात छुपे अजेंडे आहेत आणि आर्थिक स्वार्थाचे गणितही आहे, वर्चस्वाच्या साठमारीतून अशा कैक मोहिमा राबवल्या गेल्यात. या मोहिमांसाठी सोशल मीडिआचा वापर शस्त्रासारखा केला गेलाय. त्यात आयटीसेलचं चाळीस पैशांवर राबणारं भाडोत्री पब्लिक मोठ्या संख्यने कामी आलंय. द्वेष, तिरस्कार पसरवणं आणि त्याआडून वर्चस्वाची खेळी खेळत सामान्यांना हिंसेच्या आगडोंबात ढकलून देणं हे यामागचं प्रयॊजन होतं नि आहे. या मोहिमांपैकीच एक मोहीम होती - '#बॉयकॉट बॉलिवूड!'

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार - बप्पी लाहिरी..


एखाद्या माणसाला एकाच फ्रेममध्ये अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत आणि ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचे बेस्ट एक्झाम्पल ठरावेत. बप्पीदांविषयी लिहिण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचेय. साल होते १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'इन्कार'च्या यशातून शिरपेच खोवला. हेलेनचं 'मुंगळा मुंगळा' गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसले. यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद खन्ना आधी एकांतवासात आणि नंतर रजनीशआश्रमात गेला. राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदखन्नासाठी आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली ऍज लाईक बेअरर चेक ! विनोद खन्नाचे करिअर मातीत गेल्यात जमा होते. चार वर्षे ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. हा माणूस आपल्याला जाम आवडतो. अनेकदा त्याची पडझड झाली, अक्षरशः मातीमोल झाला. मात्र पुन्हा पुन्हा नव्याने तो उभारी घेत राहिला. 'मेरे अपने' ते 'कुर्बानी' हा त्याचा ग्राफ भारीच होता. तगड्या देहाचा मोस्ट हॅण्डसम नायक होता तो ! त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोलायमान होत राहिलं आणि त्याच्या सोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाने त्यात हेलकावे खाल्ले, मुलांचे करिअर दोलायमान झाले. आता तर त्याचा तरुण पोरगाही संन्यासाच्या वाटेवर आहे. असो..

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !


तमिळ चित्रपट '96' मधला हा सीन 'वन ऑफ द फाइनेस्ट प्रपोज' आहे !

'आय लव्ह यू' म्हणायची गरजही बऱ्याचदा पडत नाही कारण डोळयांची भाषा प्रेमात अधिक टोकदार असते.
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

प्रेमिस्ते...


विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि  पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !

बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..

मंगळवार, ४ मे, २०२१

मासूम - दो नैना एक कहानी...


आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.

सोमवार, २९ मार्च, २०२१

नापसंत ठरलेली डाकूराणी - बँडिट क्वीन..


दिवाळीचा महिना तोंडावर आला होता. धड पावसाळा नाही आणि उन्हाळाही नाही अशा विचित्र पद्धतीचे हवामान होते. अंगातलं घामटं निघत होतं. नाही म्हणायला रात्र थोडीशी सरल्यावर उत्तररात्रीची सोलापूरी थंडी जाणवत होती. मीना टॉकीजची नऊच्या शोची दोन तिकिटे काढून मित्रासोबत पिक्चरला गेलो. सिनेमा काय बघितला मस्तक दोन दिवस सुन्न झालेलं. तो चित्रपट होता बँडिट क्वीन. उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (कोळींशी समांतर) जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म. वसंतोत्सवात जन्मलेली म्हणून तिचे नामकरण ‘फुलन’ ! फुलनचे मायबाप अगदी दरिद्री, असहाय्य होते. वडिलांच्या तुलनेत आई स्वभावानं थोडीशी खाष्ट. फुलन तिच्या आईसारखी होती निडर आणि फाटक्या तोंडाची ! तिला चार भावंडं पैकी तीन बहिणी आणि एक भाऊ. फुलनच्या बापाची सगळी जमीन तिच्या चुलत्याने हडप केलेली. वरतून तो त्यांना छळायचा. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे. फुलनसह चारी भावंडांना ठोकायचा. अनेकदा उपाशी राहणारी फुलन सर्व घरकामे करण्यात तरबेज होती. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तीस वर्षाच्या पुट्टीलाल सोबत लावून देण्यात आलं. फुलनला न्हाण येण्याआधीच तो तिला घरी घेऊन गेला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली. चित्रपटातला हा सीन पाहताना अंगावर काटा आला. लहानग्या फुलनच्या किंकाळ्या कानातून मस्तकात खोल उतरल्या. तिचा अनन्वित छळ होतो, मारझोड होते. त्याच्या जाचाने भांबावून गेलेली फुलन दोनेकदा माहेरी पळून जाते. मात्र तिची कशीबशी समजूत घालून तिला पुन्हा त्याच्या ताब्यात दिले जाते.

रविवार, १४ मार्च, २०२१

बॉक्स ऑफिसची देवी - जय संतोषी माँ


ऐंशी नव्वदच्या दशकात पत्रव्यवहार तगून होता. पोस्टकार्ड, अंतरदेशीय यांचा मुबलक वापर व्हायचा. तातडीच्या निरोपासाठी तार जिवंत होती. मनीऑर्डर देखील वापरात होती. तेंव्हा ठराविक पद्धतीचा पत्रव्यवहार जास्ती चाले. कुटुंबातल्या परगावी गेलेल्या सदस्याने पाठवलेली प्रेमपत्रे, मित्रांची - प्रेमाची पत्रे, ख्याली खुशालीची पत्रे, कामकाजाची, शासनाची पत्रे असा सगळा मामला होता. यात काही आगंतुक पत्रे देखील असत. आपल्या घरच्या लोकांनी कुठं कपडे खरेदी केली असेल तर त्या दुकानदाराने आपली आणि आपल्या खिशाची आठवण काढलेली पत्रे असत, नानाविध ऑफर्सची पत्रे असतं. अगदी 'फाडफाड इंग्लिश बोला'  पासून ते 'घरबसल्या ज्ञान आणि पैसे कमवा' अशीही आवतने त्यात असत. पैकीच एक पत्र संतोषी मातेच्या भक्ती परीक्षेचं असे ! ज्यांना हा प्रकार ठाऊक नाही त्यांना त्यातली मजा कळणार नाही. आपल्यावर अधिकचा जीव असणाऱ्या कुणी तरी एका आपल्याच हितचिंतक व्यक्तीने वा परिचिताने ते पाठवलेलं असे. संतोषी मातेचा कृपाप्रसाद हवा असेल तर अशाच मजकुराचे पत्र आपल्या परिचयाच्या एकवीस व्यक्तींना पाठवावे अशी विनंती त्यात असे, असं न करता पत्र फाडून फेकून दिल्यास मातेचा प्रकोप होईल अशी धमकी देखील त्यात असे. पत्राच्या सुरुवातीसच 'जय संतोषी  माँ' असे लिहिलेलं असल्याने नंतर नंतर ही पत्रे लगेच ओळखता येऊ लागली आणि पूर्ण न वाचता फेकून दिल्याचं, फाडल्याचं समाधान लोक मिळवू लागले. ही जय संतोषी माँ पत्रे महिन्यातून किमान एकदोन तरी येत असत, इतका त्यांचा पगडा होता. हे खूळ कुणी काढलं हे सांगता येणार नाही मात्र संतोषी मातेला देशभर कुणी आणि कधी प्रकाशझोतात आणलं हे निश्चित सांगता येईल. त्यासाठी चार दशके मागं जावं लागेल.

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

मुन्नाभाई एमबीबीएस - प्रकाशाची अदृश्य ओंजळ..




आमच्या सोलापूरमधील मीना चित्रपटगृहात 2003 साली डिसेंबरमध्ये लागला होता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. विधू विनोद चोपडा लिखित निर्मित मुन्नाभाईचे दिग्दर्शन केले होते राजकुमार हिरानीने. संजय दत्त, अर्षद वारसी, ग्रेसी सिंह, बोम्मन इराणी, जिमी शेरगिल, सुनील दत्त आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका त्यात होत्या. खेड्यातील एका सेवाभावी दांपत्याचा शहरात राहणारा तरुण मुलगा मुन्नाभाई हा अपहरण, खंडणी अशा अवैध धंद्याचा बादशहा असतो, त्याच्या साथीला सर्किट हा त्याचा मित्र अख्ख्या टोळीसह काम करतो. आईवडील भेटीस यायचे कळताच ही मंडळी मुन्नाभाईच्या ठिय्याचं रुपांतर इस्पितळात करत असतात, मुन्ना डॉक्टर आणि बाकीची मंडळी रुग्ण असल्याची बतावणी करत असतात. पुढे जाऊन मुन्नाला खरेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्याच्या बालमैत्रिणीवरील प्रेमापोटी तो तिथे रमतो. तिथल्या बऱ्यावाईट गोष्टींवर आपल्या स्टाईलने व्यक्त होतो. अखेरीस त्याचे बिंग उघडे पडते मात्र त्याच्यातला माणूस त्याच्या वाईटपणावर मात करतो जो सर्वांना भावतो अशी रम्य कथा यात होती. ‘मुन्नाभाई’ देशभरात सुपरहिट झाला तसा सोलापुरातही झाला. मात्र इथे त्यावर पब्लिकने अंमळ जास्त जीव लावला कारण त्यातलं वातावरण, त्यातली माणसं, त्यातलं खुलेपण, जिंदादिल तरुणाई या शहराशी मेळ खाणारी होती. सोलापूरची जडणघडणच अशी झालीय की इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर जाऊन पाहिलं तर इथे निवांतपणा अधिक आढळतो, फुरसत असलेली रिकामटेकडी मनमिळाऊ माणसं खंडीभर दिसतात. इथल्या बोलीत एक तऱ्हेचा रफटफ अंदाज आहे आणि इथली तरुणाई काहीशी बेभान नि आव्हानात्मक वाटते, इथे एक प्रकारचा संथपणा आहे जो माणसाला एकमेकाशी व्यक्त व्हायला भाग पाडतो. श्रमिकापासून ते गर्भश्रीमंतापर्यंतचे लोक इथे असले तरी एक सोलापुरी बेपर्वाई आणि कमालीची आपुलकी इथे सर्रास जाणवते. ‘मुन्नाभाई’मध्ये हे घटक ठासून भरलेले असल्याने इथल्या लोकांनी त्यातल्या पात्रात स्वतःला शोधले तर त्यात नवल ते काय ? असो. फिल्मी मुन्नाभाई संजयदत्तच्या असली आयुष्यातला एक योगायोग इथे सांगावा वाटतो.

रविवार, ५ जुलै, २०२०

फिर तेरी कहानी याद आई ...

fir teri kahani yaad ayee


तो एक प्रतिभाशाली कर्तृत्ववान विवाहित पुरुष, एका बेसावध क्षणी एका कमालीच्या देखण्या अप्सरेचं त्याच्यावर मन जडतं. तो तिला टाळू पाहतो पण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तिला जवळही करू शकत नाही. त्याचा संसार उध्वस्त व्हायची वेळ येते. त्याची पत्नी उन्मळून जाते, त्यांचं आयुष्य विस्कटतं. पण तो पत्नीशी सर्व गोष्टी शेअर करतो. ती ही त्याच्यावर विश्वास ठेवते. तुझे मन माझेच असेल, देह कोणाचाही असू शकतो असं त्याला सांगते. मात्र तरीही त्यांच्यात गैरसमज होत जातात. अखेर त्यांचा घटस्फोट होतो. तोवर बराच उशीर झालेला असतो. ती शापित अप्सरा तोवर खचून गेलेली असते. ती अंधाऱ्या विजनवासाच्या एकांती गुहेत जाते. इकडे तो दुसरे लग्न करतो तेही एका मनस्वी समजूतदार स्त्रीशी !

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीदेवी - नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..



काल 'ती' गेल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या लोकात अमोल पालेकरांचा समावेश होता याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याला कारणही तसेच होते. लकवा मारलेल्या फुम्मन (अमोल पालेकर) या कुरूप अजागळ नवऱ्याच्या उफाड्याच्या बांध्याची षोडश वर्षीय पत्नी मेहनाची भूमिका तिने एका चित्रपटात केली होती ! १९७८ मध्ये आलेला हा चित्रपट होता 'सोलवा सांवन' ! याचे तमिळ व्हर्जन (पथीनारु वयतीनील - सोळावा श्रावण ) तिच्याच मुख्य भूमिकेने अफाट गाजले होते. त्यात रजनीकांत आणि कमल हासन होते. हिंदीत मात्र अमोल पालेकरांसोबत हीच केमिस्ट्री जुळली नाही. ती काही फारशी रूपगर्विता वगैरे नव्हती. तिचे नाक किंचित फेंदारलेले होते, ओठही काहीसे मोठे होते, वरती आलेले गोबरे गाल, कुरळे केस आणि बऱ्यापैकी सावळा रंग असा काहीसा तिचा इनिशियल लुक होता. तिचे सुरुवातीचे तेलुगु - तमिळ सिनेमे पाहिल्यावर हे लगोलग जाणवते. मात्र तिच्याकडे काही प्लस पॉइंट होते, कमालीचे बोलके डोळे, काहीसा सुस्कारे टाकल्यासारखा खर्जातला आवाज, सशक्त अभिनय आणि अत्यंत आखीव रेखीव आकर्षक देहयष्टी ! तिने स्वतःच्या रुपड्यात आमुलाग्र बदल करत 'रूप की राणीत' कधी कन्व्हर्ट केले कुणालाच कळले नाही. काल ती गेल्यावर याची जाणीव प्रकर्षाने झाली.

मंगळवार, ९ मे, २०१७

पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....


१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.

महेश भट्टच्या प्रेमात देहभान हरपलेली परवीन एकदा सुरा हातात घेऊन त्याच्या घरात घुसली होती आणि महेशनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर हात जोडल्यानंतर तिने तिथून पाऊल काढते घेतले होते. (हाच प्रसंग त्यांनी 'अर्थ'मध्ये दाखवला होता). या नंतर बरेच दिवस महेशभट्ट परवीन बाबीकडे फिरकले नाहीत. तिनं मात्र पिच्छा पुरवला. शेवटी काही दिवस तिच्यापासून स्वतःला चुकवत फिरणाऱ्या महेश भट्टनी तिचं घर गाठलं तर त्यांना दारात उभं पाहून तिला हर्षवायुच व्हायचा राहिला होता. महेश आत आल्यावर तिनं भाबडेपणाने सगळी दारं खिडक्या लावून घर बंदिस्त करून घेतलं. जणू आता महेश तिच्या घरात कायमचे कैद झाले असा तिचा होरा असावा. पण पुढे जाऊन नियतीने तिची क्रूर चेष्टा केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. असो.... ही घटना महेश भट्ट यांच्या मनावर खोल कोरली गेली अन तिचे पडद्यावरील प्रकटीकरण म्हणजे 'जख्म'मधलं हे गाणं...

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

सौतन - पडद्यामागची करुण कथा ...



१९८२ चा सुमार असावा. फिल्मसिटीत 'सौतन'चे शुटींग चालू होते. आपली लाडकी पत्नी रुकू (टीना मुनीम) हिच्यापासून दुरावला गेलेला श्याम (राजेश खन्ना) सैरभैर होऊन जातो. आपल्या मनातले वादळ शांत करण्यासाठी ऑफिसमध्ये स्टेनो असणाऱ्या गोपालकाकांच्या (श्रीराम लागू) घरी त्यांच्या मुलीला राधाला (पद्मिनी कोल्हापुरे) भेटायला येतो असा सीन शूट होत होता. काही केल्या राजेशला तो सीन देता येत नव्हता. सलग तीन दिवस त्याने त्या सीनसाठी घालवले. दिग्दर्शक सावनकुमार टाक नाराज झाले. चौथ्या दिवशी ते राजेशच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तर त्याने तिथेच हलका 'डोस' लावायला सुरुवात केली होती. सावनकुमारनी त्याला स्वतःला सावरायला सांगितलं. काही वेळ निशब्द शांततेत गेले. त्याचे डोळे गच्च भरून आले होते, चेहरा विमनस्क झाला होता, केस अस्ताव्यस्त झाले होते. तो हलकेच उठला आणि सावनकुमारना काही कळण्याआधी त्यांना घट्ट मिठी मारली. तो लहान मुलांसारखा ढसाढसा रडला. त्याला शांत व्हायला बराच वेळ लागला. त्या नंतर काही मिनिटांत तो बाहेर आला आणि एका फटक्यात त्याने शॉट ओके केला. कुणाशीही न बोलता सेटवरून तडकाफडकी निघून गेला....

गुरुवार, ३० मार्च, २०१७

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...



खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.