रविवार, १० सप्टेंबर, २०१७

रेड लाईट एरिया आणि मुंबईतल्या एनजीओ...

रेड लाईट एरियावरील पोस्टस वाचून अनेकजण भारावून जातात. 'यासाठी आम्ही काय करू शकतो ?' अशी विचारणा करतात. सर्वांनीच प्रत्यक्ष ठोस कृती करावी म्हणून मी हे लेखन करत नाही. या उपेक्षित आणि शोषित घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यावर मुख्य फोकस आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदत करावी वाटते त्यांनी शक्यतो एनजीओजच्या कार्यालयांना थेट भेट दिल्याशिवाय आर्थिक मदत देऊ नये असे माझे मत आहे. पेक्षा आपल्या भागातील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास सोबत घेऊन अशा वस्त्यांत आपली मदत वस्तूस्वरूपात देणं योग्य.

सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)


कोणताही उत्सव आला की कुठल्याही भागातील रेड लाईट एरियातील स्त्रियांना थोडीशी धास्तीही वाटते अन काहीसे हायसेही वाटते. कारण येणारा दिवस कशाचे तोंड बघायला लावतो, काय घडवतो याची त्यांना धास्ती असते अन उत्सवामुळे गर्दीत, गिऱ्हाईकात वाढ होऊन कमाईत चार पैशांची वाढ होणार या जाणीवेने हायसे वाटत असते. खरे तर सण, उत्सव कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो वा पोटजातीचा असो त्याच्या कामांचा जास्त ताण त्या त्या वर्गातील स्त्रियांना पडतो. मग त्या स्त्रिया गरीब वर्गातल्या असोत वा उच्चभ्रू वर्गातील्या असोत, त्यांना ताण हा पडतोच. बहुतांश पुरुष मंडळी त्या त्या सण उत्सवासाठी लागणारं साहित्य आणून दिलं की आपलं काम संपलं अशा अविर्भावात असतात, सणासुदी दरम्यान लहान मुलांचा वा वृद्ध व्यक्तींचा सहयोग कमी अन त्रास जास्त असतो. पण बायका त्याबद्दल कधीही तक्रार करत नाहीत. या सणाउत्सवातला खरा आनंद त्या मिळवतात कारण, त्या आनंद वाटत असतात ! याला रेड लाईट एरियातील स्त्रिया देखील अपवाद नसतात.

सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (पूर्वार्ध)


“गणेशोत्सव जवळ आला की आमच्या मनात नानाविध तऱ्हेचे काहूर उठते..” पुण्याच्या बुधवार पेठेलगत असलेल्या शुक्रवार पेठ पोलिस चौकी नजीकच्या रेड लाईट एरियाच्या तोंडावर असणाऱ्या चांदणी बिल्डींगमधली वंदना डोळे विस्फारून असंच काहीबाही सांगत राहिली. त्यातलं काही मेंदूत साचून राहिलं तर काहीचा काळानुसार निचरा झाला. दोन वर्षापूर्वीच्या गणेशोत्सवात पुण्यातील वेश्यांचा (आताच्या भाषेतील सेक्सवर्कर्सचा) या उत्सवाबद्दलचा मूड टिपून घ्यायचा होता तेंव्हा नानाविध अनुभव आले. त्याच्या मागच्या वर्षी मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचे अनुभव घेतले होते. यंदा महाराष्ट्राच्या सीमेवर असणारया विजापूरात याच कारणासाठी आलो असताना थोडया वेगळया जाणिवांची अनुभूती झाली. बागलकोट रोडलगत असणाऱ्या एका वसाहतीबाहेर एक दिवस आणि नजीकच्या इंडी शहरात एक दिवस भेटी गाठींचे शेड्युल होते.

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

'लांड्या' विचारांचा मुखभंग ...


पंधरा ऑगस्टच्या एक दिवस आधी आपल्या लोकांच्या मेंदूपासून ते बुडख्यापर्यंत राष्ट्रप्रेमाचे झरे वाहत असतात. हा साथीचा आजार फक्त तीन दिवसच असतो. आता तर व्हॉटसएपचे बिनडोक फॉरवर्डछाप पब्लिक देशभरात प्रसरण पावलेलं असल्याने याचे पेव गल्लोगल्ली आढळते. कुणी कच्चा हरभरा खाल्ला तरी त्याचा गंध त्याच्या सोशलमिडीयातून इतरांच्या मोबाईलमध्ये पसरतो. असो. आवड ज्याची त्याची..
तर पंधरा ऑगस्टला आलेल्या देशप्रेमाच्या भरतीत पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलाम करणारी मुले आणि त्यांचे शिक्षक हा फोटो देशभरात व्हायरल वगैरे झाला. अनेकांनी त्यांना सलाम, त्रिवार वंदन, कडक कुर्निसात, सेल्युटही केला. अनेकांनी त्यासोबत आपल्या बद्धकोष्टी कवितादेखील पोष्टून आपलं काव्योदर साफ करून घेतलं. असो ज्याचं त्याचं पोट...

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

दाभोलकरांच्या पश्चातची चार वर्षे....



२० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विवेकवादाची दिवसाढवळ्या निर्घृणहत्या करण्यात आली. त्या घटनेला आज चार वर्षे पूर्ण झाली. अत्यंत भ्याड हल्ला करून या दिवशी त्यागवादी सजगतेवर नियोजनपूर्वक घाला घातला गेला. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सनातनी विचारांना वंदनीय मानणाऱ्यांनीच केल्याचा कयास त्या दिवसापासूनच उभ्या महाराष्ट्राने व्यक्त केलाय. ही हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वसनांवरचा रक्तरंजित डाग आहे ज्याचे सद्य स्थितीत तर कोणत्याच राजकीय पक्षाला कसलेच सोयरसुतक दिसून येत नाही.गांधीवादी विचारांवर श्रद्धा ठेवून आपली चळवळ शांततेच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका निशस्त्र व्यक्तीस मारलं गेलं तेंव्हा राज्यभर नव्हे तर देशभर त्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला,सर्वत्र एकच कोलाहल माजला तरी तपास यंत्रणांच्या कानात जू रेंगली नाही की कोणा राजकारण्याला याचा खंतखेद वाटला नाही. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, तपास जलदगतीने व्हावा म्हणून राज्यातील विरोधी पक्ष लाजेकाजेने का होईना अधूनमधूनक्षीण आवाज उठवताना दिसतात. त्यांचा आवाज असा क्षीण का आहे याला विविध कारणांची 'भगवी','हिरवी', 'निळी' झालर आहे.

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...




देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील सर्व घटकांना स्वातंत्र्य मिळाले का याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्या देशात आजही अनेक प्रकारचे वंचित, पीडित, शोषित आहेत, त्यातलेच काही वर्ग आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले नाहीत. यातीलच एक घटक म्हणजे अलीकडच्या सभ्य जगाच्या ढोंगी शब्दात सेक्सवर्कर वा देशी भाषेत वेश्या होत. त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्याची ‘खरी’ सकाळ कधी उगवेल की नाही हे नेमके कोणी सांगू शकत नाही. अशाच एका दुर्दैवी मुलीची ही एक करुण कथा.

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

'आई'ची कविता आणि महाकवी नामदेव ढसाळ....



आई गेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते. दुःख याचं आहे की, अज्ञानाच्या घोषा आड  तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या, गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं दुःख याचं आहे, तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

वृत्तवाहिन्यातील पत्रकारिता - अस्तंगत होत चाललेले सत्यतत्व.


'हाऊ सेन्सॉरशिप वर्क्स इन ब्लादीमीर पुतीन्स रशिया' या मथळ्याची बातमी अमेरिकेतील सर्वोच्च खपाचे दैनिक असणाऱ्या 'द वॉशिंग्टन टाईम्स'ने ९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात छापली होती तेंव्हा रशियन प्रशासनाला त्याच्या फार मिरच्या झोंबल्या होत्या, अमेरिकन मिडीयाने वाकुल्या दाखवत याचा आनंद घेतला पण तो फार काळ टिकला नाही जेमतेम वर्षातच अमेरिकेतच याहून वाईट परिस्थिती आली. डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी नावडत्या प्रसारमाध्यमांना व्हाईटहाऊसची दारे बंद केली. जी प्रसारमाध्यमे आपल्यावर आपल्या धोरणावर टीका करतात ती ‘अमेरीकाविरोधी’ असल्याचा कांगावा त्यांनी सुरु केला. टीका कारणाऱ्या प्रसारमाध्यमांना त्यांनी 'अपोझिशन पार्टी' असं हिणवून पाहिलं. यामुळे या माध्यमांच्या नाकात वेसण घातली गेली, काही माध्यमे झुकली तर काही आपल्या तत्वांवर टिकून राहिली. यातून ज्यांनी ट्रम्प प्रशासनापुढे आधीच पायघड्या अंथरल्या होत्या त्यांची मात्र चंगळ झाली. फ्रीलान्स पत्रकार डेरेक थॉम्पसन यांनी 'द अटलांटीक' मध्ये काही दिवसापूर्वी रंजक आढावा घेतला आहे त्यात काही महत्वाची तथ्ये समोर आलीत. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यापासून फॉक्स न्यूज, एमएसएनबीसी आणि सीएनएन यांची किती चंगळ सुरु झाली आहे हे त्यांनी आकडेवारी सहित दिले आहे. त्याच बरोबर प्रिंट मिडीयात आपल्या आवडत्या समूहाला त्यांनी जाहिरातीचा मलिदा कसा वाटला गेला याची रोचक माहिती त्यात आहे. जगभरातील मिडीयाचा आढावा घेताना 'द गार्डियन' या कुरापतखोर दैनिकाने २४ मार्च २०१७च्या अंकात ब्लादिमीर पुतीन त्यांना न आवडणाऱ्या मिडिया समूहाशी कसे वागतात आणि त्यांची पत्रकारीतेबद्दलची भूमिका काय आहे हे खोचक पद्धतीने मांडले आहे.

मंगळवार, २५ जुलै, २०१७

परंपरांचे गळके सण...



आखाडात मरीआई आणि म्हसोबाचा रुबाब असतो.
तोंडाला शेंदूर फासून अभ्राणात मिरवणाऱ्या पोतराजालाही भाव चढतो.
सतराशेसाठ रूढी परंपराच्या डबक्यात लोळणाऱ्या सकल समाजाला आखाड ही पर्वणी असते.
ग्रामीण भागात याच्या जोडीला आणखी एक पात्र जोमात असते ते म्हणजे 'साती आसरा'.
हे पात्र जरा हॉरर कॅटेगरी मोडणारे आहे.
याची खानेसुमारी स्त्री पिशाच्चात (?) केली गेलीय.
आत्म्याला आणि भूताला लिंग असते का असा खोचक सवाल आपल्या लोकांना पडत नाही. साती आसरा या अप्सरारुपी हडळीच आहेत असं अजूनही अज्ञानात खोल बुडालेल्या समाजाला वाटते.
स्त्री पिशाच्च प्रकारामध्ये हडळ या नावातच एक जरब आहे नुसत्या उच्चारानेही काही भोंगळ लोकांना कापरे भरते.
जिथे जिथे जलाशय असतात, तिथे तिथे साती आसरा (जलदेवता/ अप्सरा/ हडळी) असतात, अशी लोकधारणा आहे...

शनिवार, २२ जुलै, २०१७

गुन्हेगारांचे जातीय उदात्तीकरण..


राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजनीतीकरण आपल्या देशाला अलीकडे सवयीचे झाले आहे त्याचे फारसे वैषम्य कुणालाच वाटत नाही. हा मुद्दा आता नागरीक, प्रशासन आणि सरकार या तिन्ही प्रमुख घटकांच्या अंगवळणी पडला आहे. सर्व वर्गातील गुन्हेगार राजकारण्यांच्या संपर्कात असतात हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे. जनतेने, मिडीयाने त्यावर वेळोवेळी टीकाही केली आहे. पण मागील काही दशकात याचा एक वेगळा ट्रेंड तयार होताना दिसतो आहे त्याचा थेट परिणामही आता दिसून येऊ लागला आहे.  स्वातंत्र्याआधीही आपल्या देशात अनेक गुन्हेगार होऊन गेलेत. पण त्यांची कधीच व कुणीच भलावण केली नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात या दृष्टीकोनात झपाट्याने बदल घडत गेले. गुन्हेगारी जगतात शिरताना काही लोकांनी आपल्यावरील अन्यायासाठी बंदूक हाती घेतली, अपराधाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. त्या व्यक्तीशी निगडीत काही वर्गातील विशिष्ट लोकांनाच या बद्दल थोडीफार सहानुभूती असल्याचंही दिसून आलं. फुलनदेवी हे याचं सर्वात बोलकं उदाहारण ठरावं. फुलनचे समर्थन करणारे एका विशिष्ट भूभागापुरतेच मर्यादित होते. तिच्यावरील अन्यायाचे कोणीही समर्थन करायला नको होते पण एका ठराविक वर्गाने तेही केलं तेंव्हा त्यांच्या अरेला कारेचा आवाज आपसूक आलाच. हीच अवस्था विविध राज्यात थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या रुपात आढळून येऊ लागली आणि राजकारण्यांना यातील व्हॅल्यू पॉईंट ध्यानी आले. त्यांनी खतपाणी घालायला सुरुवात केली आणि असे लोक सर्वच राज्यातील विधीमंडळातच नव्हे तर संसदेतही दिसू लागले.